करोनामुळे भयभीत परप्रांतीयांची सर्व व्यवस्था स्वीकारली
थेऊर- हवेली तालुक्यातील होळकरवाडी परिसरातील कामे करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने परप्रांतीयांची उपासमार होऊ लागली आहे. वाहतूक व्यवस्था बंद असलेने त्यांनी पायी आपल्या मध्यप्रदेशातील गावी जाण्याचा निर्णय घेऊन वाटचाल सुरू केली. मात्र, हवेलीतील महसूल पथकाने चाळीस- पंचेचाळीस जणांना पोलिसांच्या मदतीने थांबवून अनिश्चित परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत त्यांची राहण्याची, जेवणाची व औषधोपचाराची व्यवस्था करण्याची जबाबदारी उचलली असल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे स्व:खर्चातून महसूल व पोलीस पथकाने फक्त तासाभरातच त्यांना जीवनावश्यक वस्तू तात्काळ देत मदतीचा हात दिला आहे.
हवेली तालुक्यातील होळकरवाडी परिसरात एका वीटभट्टीवर हे सर्वजण काम करतात, करोनामुळे सर्व काम बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यात बाहेर कोठेही मजुरीचे काम मिळत नसल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाली होती. सार्वजनिक व इतर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने सर्वांनी गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अनेकांकडे लहान मुलेही आढळून आली. हे सर्वजण गावी जाणेसाठी पायी निघाले असता हवेली महसूल प्रशासनातील मंडलाधिकारी व्यंकटेश चिरुमुल्ला, तलाठी शिवाजी देशमुख, श्रीकृष्ण शिरसाट यांच्या पथकाने त्यांना थांबण्याच्या सूचना दिल्या. मात्र, करोना संसर्ग रोगाचा फैलाव होऊ शकतो, हेही ज्ञात असूनही ते मूळ गावी जाण्याच्या निर्णयावर ठाम होते.
परिस्थितीची वेळीच जाणीव ध्यानात घेऊन मंडलाधिकारी व्यंकटेश चिरुमुल्ला यांनी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थिती कथन केली. त्यांच्याकडून सुचनेनुसार त्यांनी तातडीने कंट्रोल कक्षास माहिती देऊन पोलीस कुमक मागवली. त्यानंतर तातडीने सहायक पोलीस निरीक्षक जयवंत पाटील हे पथकासह त्याठिकाणी हजर झाले. महसूल प्रशासनाने तोपर्यंत जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून पुढील खबरदारीसाठी मार्गदर्शन घेतले. मात्र, उपासमार होऊन मरण्यापेक्षा आमचे गावाकडे आम्ही जाणारच, ही भूमिका त्या समूहाने प्रशासनापुढे अखेरपर्यंत ठेवल्याने सर्वजण हतबल झाले होते.
तब्बल तीन तासांनंतर महसूल प्रशासनाने त्यांची सर्व जबाबदारी स्वखर्चाने उचलण्याची ग्वाही देत त्यांना एक आठवड्याचे धान्य, पालेभाज्या, कडधान्य, पाणी व इतर जीवनावश्यक वस्तू तात्काळ देत त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन त्यांना थोपविण्यात यश मिळवले. ताबडतोब त्यांना विशेष वाहनाद्वांरे त्यांच्या निवासाच्या ठिकाणी पोहचविले. त्यांचे संपूर्ण अन्नभोजन, औषधोपचाराच्या खर्चाची सर्व जबाबदारी महसूल प्रशासनाने काही दानशूर व्यक्ती व विविध सेवाभावी संस्थेच्या मदतीने स्वखर्चाने उचलली ओहे. परप्रांतीय नागरिकांना संकटकाळातही माणुसकीचे दर्शन घडले. फक्त काही तासांमध्ये चाळीस जणांच्या परप्रांतीयांची जबाबदारी स्वीकारून त्यांना प्रत्यक्षात मदत दिल्याने महसूल व पोलिसांच्या वेगळ्या जबाबदारीचे परिसरातून कौतुक होत आहे.