नवी दिल्ली/मुंबई/पाटणा/लखनौ : कोरोनाच्या साथीमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र त्यामुळे दोन घास तरी पोटात पडावेत म्हणून जीव धोक्यात घालून आणि देशाने लादलेले सारे निर्बंध धुडकावत लाखो पावले आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली आहेत. मात्र घरातही त्यांचं उत्साहानं स्वागत न होता कोठून आली ही ब्याद अशीच वागणुक मिळत असल्याचे भीषण वास्तव यामुळे पुढे आले आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशमधील लाखो स्थलांतरीत देशाच्या कानाकोपऱ्यांत पोटासाठी धाव घेत आहेत. पण आता त्यांची तेथील रोजी रोटीच थांबल्यामुळे आजवर गावात पैसे पाठवत होतो. आता घरचे तरी दोन घास देतील अशा आशेने आपल्या घराकडे धावत आहेत. पण घराकडे येताच चाचणी आणि अन्य उपचाराच्या नावाखाली त्यांना बिनदिक्कतपणे वैद्यकीय प्रशासनाकडे सोपवत असल्याचे चित्र आहे.
या साथीच्या भीतीपोटी बिहारमधील अनेक गावांनी लॉकडाऊन केले आहे. त्यांनी बाहेरून येणाऱ्या तर सोडाच पण शेजारील भागात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या गावात प्रवेशबंदी केली आहे.
पाटणाजवळील अलावलपूर या खेड्यातील चार जण कामधंद्यानिमित्त नेपाळ रहात होते, ते परत येताच वैद्यकीय प्रशासनाला त्याची माहिती देण्यात आली. रुग्णवाहिका येऊन त्यांना घेऊन गेले, असे अभिषेकसिंह यांनी पीटीआय या वृत्त संस्थेला सांगितले.
फतेहपूर येथे प. बंगालमधून दरमजल करत चालत आलेल्या सहा जणांना शेजाऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. असाच प्रकार जमालपूर येथेही घडला, तेथे मुंबईहून आलेल्या नऊ जणांना पोलिस आणि वैद्यकीय प्रशासनाच्या हाती सोपवले. खरे तर त्यांनी मुंबईत तपासणी करून घेतली होते.
बदललेल्या या वातावरणाला गुआरी चेक पोस्टवरील अधिकारी नागमणी कुमार यांनीही दुजोरा दिला. सुरवातीला आम्हाला बाहेरून आलेल्यांची माहिती देणारे सुमारे 15 कॉल आले. आम्ही त्यांना वैद्यकीय पथकाकडे सोपवले आहे.
कर्नाटकात विलगीकरणात ठेवण्यात आलेला आणि त्यानंतर तेथून पळून आलेला एका व्यक्तीला प. चंपारण्य जिल्ह्यात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मिळेल त्या वाहनाने आणि वाहन मिळाले नाही तर चालत ही पावले घराच्या दिशेने वळत आहेत. पण तेथेही त्यांचे स्वागत होत नाहीच. नको रे बाबा हा पाहुणा असेच त्यांच्याशी वगले जात आहे, हाच भारतीय संस्कृतीवर झालेला कोरोना हल्ला…