नवी दिल्ली – लॉक डाऊनमुळे वाहन उद्योगाचे अतोनात नुकसान होणार आहे. या आर्थिक वर्षाच्या उरलेल्या काळामध्ये दुचाकीची विक्री मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता विश्लेषकांना वाढते.
लॉक डाऊन सुरू होण्याअगोदरच दुचाकी निर्मात्यांची परिस्थिती खराब झाली होती. कारण सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल पासून फक्त बीएस- 6 मानधनाची वाहने विकण्यास परवानगी दिली होती. या नव्या वाहनांच्या किमती जुन्या वाहनांच्या तूलनेत जास्त आहेत. त्यामुळे दुचाकी खरेदी करण्याकडे लोकांचा कल कमी होत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे विविध घटकांच्या क्रयशक्तीवर परिणाम होणार आहे. परिणामी या वर्षात दुचाकींची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढण्याऐवजी 11 ते 12 टक्क्यांनी कमी होऊ शकते असे ईक्रा या विश्लेषण करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे.
जुन्या वाहनापेक्षा नवी वाहने 11 ते 13 टक्क्यांनी महागात पडणार आहेत. या वर्षात फार तर 18 दशलक्ष दुचाकी विकल्या जाऊ शकतील असे या संस्थेचे उपाध्यक्ष समशेरा दिवाण यांनी सांगितले. त्याचबरोबर दुचाकी उद्योगाला आणखी एका मोठ्या प्रश्नाचा सामना या कालावधीत करावा लागणार आहे. जुनी बीएस 4 ऊत्सर्जन मानदंडाची वाहने डीलरना विक्रीसाठी दिलेली आहेत.
मात्र मंदी आणि लॉक डाऊन मुळे ही विक्री होऊ शकलेली नाही. ही वाहने दुचाकी निर्मात्यांना परत घ्यावी लागणार आहेत. त्याचा मोठा आर्थिक बोजा या कंपनीवर पडू शकतो. वितरकांची अवस्था कमकुवत झाली आहे. त्यामुळे त्यांना नव्याने काम सुरू करण्यासाठी वाहन कंपन्यांना वितरकांना आर्थिक मदत द्यावी लागणार आहे. जेणेकरून ते काही महिने तरी टिकाव धरू शकतील. परिस्थिती पूर्ववत होण्यामध्ये बऱ्याच महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पुढील काही तिमाहीमध्ये या कंपन्यांच्या ताळेबंदावरही परिणाम होऊ शकतो असे या संस्थेने म्हटले आहे.