भाताचे पीक कुजले
आदिवासी भागात अवकाळी पावसाने भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. भात पीक कुजल्याने भात पेंढ्याचे प्रमाण कमी आहे. भाताचा पेंढा चारा म्हणून उपयोगात येतो. भातपीक जमीनदोस्त होऊन चरात पाणी साठून पिके कुजली आहेत. त्यामुळे यंदा चारा टंचाई निर्माण होणार असल्याचे मुरलीधर भांगरे, शरद कोंडार, काशिनाथ साबळे आदींनी सांगितले.
अकोले -अवकाळी झालेल्या पावसाने खरीप पिकांची वाट लावली. त्यात तालुक्यात भात पिकाचे मोठे नुकसान झाले. आता उऱ्या सुरल्या भात कापणीला तालुक्यातील पश्चिम भागात सुरुवात झाली आहे. तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासी भागात भात, नागली, वरई कापणीस वेग आला आहे. सध्या भात कापणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्व भागात बाजरी, सोयाबीन व अन्य पिके काढून झाली आहेत. रब्बी हंगामातील गहू, हरबरा बी पेरणी अंतिम टप्प्यात आहे.
अकोले तालुक्यातील पश्चिम भात पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी भागात गेल्या काही महिन्यांपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या भात पिकांची दाणी काळी पडून कोंब फुटले आहेत. हे भात काहीच उपयोगाचे राहिले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच भात पिक पाण्याने कुजली आहेत. त्यामुळे सर्व पीक वाया गेले आहे, अशी स्थिती आदिवासी भागातील गावांमध्ये ठिकठिकाणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी आता भात कापणी करून किमान भात पेंढा चारा म्हणून कापणीला शेतकऱ्यांनी जोमाने सुरुवात केली आहे.
तसेच दिवाळीनंतर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. या वर्षांची बियाणाची रक्कमही फिटली नाही. ही सल शेतकऱ्यांना सतावत आहे.तर पुढील वर्षी पेरा करावयाचा यक्ष प्रश्न शेतकरी वर्गापुढे निर्माण झाला आहे. कारण निम्म्याहून अधिक बियाणे शेतकरी याच धान्यातून शिल्लक ठेवत असतो. त्यामुळे त्याला पेरणी करणे सोपे जाते. त्याला महागडी बियाणे घेण्यासाठी तेवढा पैसाही नसल्याने त्यांची अडचण होणार आहे.