सांगली -सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आलेल्या महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या नंदकुमार वडनेरे व समितीने शनिवारी सांगलीत तिन्ही जिल्ह्यांचे लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्यासमोर अहवाल सादर केला. वडेनेरे समितीकडून सुचविण्यात आलेल्या शिफारशींवर विचार करण्यात येईल, त्याची छाननी केली जाईल.
यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी तिन्ही जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली जाईल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या वडनेरे समितीच्या अहवालावर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार व पणनमंत्री सतेज पाटील, शंभुराज देसाई यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, वडनेरे समितीचे सदस्य आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, “”गेल्या वर्षी सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता. यावर्षी महापुराचा फटका बसू नये, यासाठी कर्नाटक सरकारसोबत समन्वय साधून चर्चा करण्यात येत आहे.” याबाबत उपायोजना करण्यासाठी आगामी काळात कोल्हापूर किंवा बेळगावमध्ये बैठक घेण्यात येईल असे सांगितले. ते म्हणाले, “वडनेरे समितीने महापुराच्या कारणांवर अभ्यास करून त्यांचा अहवाल सादर केला आहे.
यामध्ये त्यांनी धरणातील पाणीसाठे, पाणलोट क्षेत्रात पडणारा पाउस, धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग, नाल्यांवरील अतिक्रमणे तसेच कर्नाटकातील आलमट्टी आणि हिप्परगी धरणाची पाणीपातळी याबाबत अभ्यास केला आहे. याबाबत या समितीने अनेक तज्ज्ञांची मते जाणून घेतली आहेत. यानंतर सविस्तर अहवाल शासनाला सादर केला आहे.’
याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या अहवालावर तत्काळ निर्णय घेता येणार नाही. परंतु या समितीने सुचविलेल्या उपायायांवर विचार करून त्याची छाननी करण्यात येईल. अतिक्रमण झालेल्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. सुचविलेल्या अहवालाचा निष्कर्ष काढता येईल.