सातारा -कारागृहात करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सातारा आणि कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून एकूण 167 बंदीवानांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामिनावर मुक्त केलेल्या बंदीवानांना करोना संसर्गाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन घरी पोहचवण्याचे आदेश या कारागृहांना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.
सातारा आणि कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातील 573 अंतरिम जामीन अर्ज प्राप्त होते. त्यापैकी 188 अंतरिम जामीन अर्ज मंजूर झाले आहेत. अर्ज संबंधित न्यायालयाकडे पाठवून जामीन अर्जाचे कामकाज पाहण्यासाठी मोफत विधिज्ञांची नेमणूक करण्यात आली होती. 23 मार्च ते 15 जून या कालावधीत मंजूर अंतरिम जामीन अर्ज कागदपत्रांची पूर्तता करून एकूण 167 बंदीवानांना मुक्त करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा व सत्र न्यायालय इमारत व परिसर निर्जंतुकीकरण करून घेण्यात आला आहे. तसेच न्यायालयाचे कामकाज सकाळी 11 ते 2 व दुपारी 2.45 ते 5.45 अशा दोन सत्रांमध्ये सुरु करण्यात आले आहे.