Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. एकीकडे अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होत असताना देवेंद्र फडणवीसांनी २०१४ साली त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खोचक टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी १४ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वी महाराष्ट्रातील आदर्श घोटाळा व सिंचन घोटाळ्यासंदर्भात ही पोस्ट केली होती. त्यात “मतदारांनो, तुमचं मत देण्यापूर्वी आदर्श घोटाळ्याचं वास्तव या व्हिडीओमध्ये बघा”, असं फडणवीसांनी लिहिले होते.
Watch the Reality of ADARSH Scam in this video before you cast your VOTE!https://t.co/N0vmLOOsmq#MaharashtraElections #Adarsh#Scam
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 14, 2014
“हे महाघोटाळे केले कुणी? हजारो कोटी कुणाच्या खिशात गेले? आपल्या मंत्र्यांवर कारवाई का केली नाही? जबाब द्या, हे हजारो कोटी कुठे गेले?” असे प्रश्न या व्हिडीओमधून उपस्थित करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, तत्कालीन महाराष्ट्र सरकार, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, अशोक चव्हाण, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्ताधारी पक्ष यांच्यावर भाष्य करण्यात आले आहे.
अंजली दमानिया यांची पोस्ट
देवेंद्र फडणवीसांचं हे ट्वीट रीपोस्ट करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यावर खोचक पोस्ट लिहिली आहे. “(या सगळ्या परिस्थितीवर) एक वाक्य म्हणावेसे वाटते. कोण होतास तू, काय झालास तू?” असं या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. दमानिया यांनी शेअर केलेला व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
अशोक चव्हाण यांना राज्यभेत उमेदवारी मिळणार ?
दरम्यान, राज्यभेत अशोक चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली तर यामुळे काँग्रेसची मते फोडली जाऊ शकणार, त्यांच्या पक्ष प्रवेशाचा भाजपला मतदारांचा आकडा वाढवण्यात मदत होणार आहे. एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेता अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची मराठवाड्यात ताकद वाढेल. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांचा सारखा दिग्गज नेता गळाला लागला, तर काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून आणखी आमदार काँग्रेसचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडले जाऊ शकतात.