पुणे – ऐन गणेशोत्सवाच्या काळात राज्यात सतत कोसळणाऱ्या पावसाचा जोर आगामी काळात थोडा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनची तिव्रता कमी होणार असल्याने हा बादल होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आता थोडा दिलासा मिळेल.
राज्यात गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून सर्वत्र पाऊस कोसळत आहे. त्यात विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. सोमवारी सुद्धा राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या नाले दुथडी भरुन वाहत आहेत. घाट माथ्यावर पावसाचा जोर सर्वाधिक आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांमधून विसर्ग सुरु आहे. परिणामी राज्यातील विविध भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु आहे. कोल्हापूर,सातारा,पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. या अतीवृष्टीमुळे राज्यातील चार राज्य मार्ग व 18 प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे.त्याचबरोबर प्रमुख मार्गावरील सुमारे वीस पुल पाण्याखाली गेल्याने साधारणत; तीनशेहनू अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
राज्यात गेले दहा दिवसांपासून सुरु असणारा पावसाचा हा जोर आता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा आणि मान्सूनचा आस त्यामुळे मध्य भारतात ढग निर्माण झाले होते त्याचा परिणाम हा राज्यात पावसाला सुरवात झाली होती पण आता मध्य भारतातील हे कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले आहे.त्याचबरोबर अरबी समुद्रात निर्माण झालेला चक्रावात आता गुजरातकडे सरकल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानूसार राज्यात येत्या चोवीस तासात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे,मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर आणखी एक दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.पुणे शहरात पुढील चोवीस तासात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत त्याचबरोबर वातावरण ढगाळ राहील.