प्रशांत जाधव
जिल्ह्यात “एक गाव एक गणपती’ जोशात; एकीचे दर्शन
सातारा – संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. अशीच एक दिशा साताऱ्याचे सुपुत्र व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राला मिळाली. दाभोलकरांनी मांडलेल्या “एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला राज्यात प्रतिसाद मिळत असून यात त्यांचा सातारा जिल्हाही मागे राहणार नाही. यावर्षी जिल्ह्यातील पाचशे बारा गावातील तरुण व ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवून “एक गाव एक गणपती’ या डॉ. दाभोलकरांच्या स्वप्नाला साद घातली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात होणारी पैशांची उधळपट्टी थांबावी, गावातील वाद मिटावेत आणि लोकवर्गणीचा चांगल्या कामांसाठी उपयोग व्हावा यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी “एक गाव एक गणपती’चा पुरस्कार करत हा उपक्रम गावागावात पोहोचवण्याचे काम केले होते. त्यापासून प्रेरणा घेत राज्य सरकारनेही महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात “एक गाव एक गणपती’ उपक्रमाचा समावेश केला. महाराष्ट्रातील जनतेला दहा दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जायचे. मात्र, बदलत्या काळात त्याचा “इव्हेंट’ झाल्यापासून आणि त्यात राजकीय हस्तक्षेप वाढल्यापासून या उत्सवाची दशा आणि दिशा पुरती बदलली होती.
हीच गोष्ट डॉ. दाभोलकरांनी हेरली आणि “एक गाव एक गणपती’ या उपक्रमासाठी तरुणाईला साद घातली होती. त्याला तत्कालीन राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी तंटामुक्त गाव योजनेचा भाग करून मोठी जनजागृती केली होती. दरम्यानच्या काळात संमिश्र यश मिळालेला हा उपक्रम आज गावागावात तरुणाईचा “ड्रीम’ उपक्रम म्हणून राबवला जाताना दिसत आहे.
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सातारा शहर 2, सातारा तालुका 41, बोरगाव 21, कराड तालुका 34, तळबीड 3, उंब्रज 25, वाई 33, महाबळेश्वर 16, पाचगणी 14, मेढा 74, भुईंज 25, कोरेगाव 12, पुसेगाव 19, रहिमतपूर 13, वाठार 22, वडूज 10, दहिवडी 23, म्हसवड 4, औंध 7, फलटण शहर 1, फलटण ग्रामीण 6, लोणंद 18, खंडाळा 10, शिरवळ 13, पाटण 26, कोयनानगर 15, ढेबेवाडी 25 गावांमध्ये “एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवण्यात आला आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यात पाच हजार 126 सार्वजनिक मंडळांनी तर दोन लाख 739 घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. “एक गाव एक गणपती’ उपक्रमात तरुणांबरोबर पोलीस दलाचे मोठे योगदान आहे. गणपतीबाप्पांचे आगमन होण्यापूर्वी पोलीस दलाने या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती.