नवी दिल्ली : मागील महिन्यात ओडिशाच्या बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन तब्बल ३०० निरपराध लोकांचा जीव गेला होता. अपघाताच्या चौकशीचे सत्र अजून सुरूच आहे तोपर्यंत रेल्वे प्रशासनाची एका निनावी पत्राने झोप उडवली आहे. बालासोर प्रमाणेच आणखी एक अपघात दिल्ली-हैदराबाद रेल्वे मार्गावर होणार असल्याची धमकी या पत्रातून रेल्वे विभागाला देण्यात आली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेला हे धमकीचे पत्र मिळाले आहे. या निनावी पत्रात पुढील आठवड्यातच असा अपघात होईल, असे म्हटले गेले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र ३० जून रोजी लिहिले होते. तर, गेल्या आठवड्यात हे पत्र रेल्वेला मिळाले आहे.
एससीआर पोलिसांनी याबाबत तेलंगणा पोलिसांना सतर्क केले आहे. तसेच, राज्याच्या गुप्तचर विभागाला देखील याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. दिल्ली-हैदराबाद मार्गावर नेमका कुठे हा अपघात घडू शकतो याबाबत पत्रात माहिती दिलेली नाही. मात्र, या अपघाताची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाल्याचे यात म्हटले आहे.
दरम्यान, बालासोरमध्ये झालेला भीषण अपघात हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे यासाठी रेल्वे सुरक्षा आयोग आणि रेल्वे बोर्डाने संयुक्तपणे तपास केला होता. सिग्नलिंगमध्ये झालेल्या काही त्रुटींमुळे ही दुर्घटना घडल्याचं या तपासात दिसून आले होते. सिग्नलिंग आणि दूरसंचार (एस अँड टी) विभागाची यात मोठी चूक असल्याचे म्हटले होते. या अपघातामध्ये सुमारे ३०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे १००० प्रवासी जखमी झाले होते. २ जून रोजी हा भीषण अपघात झाला होता.