सविंदणे – पुणे जिल्हा परिरूषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रेंगाळल्या आहेत. तब्बल दोनदा मुदतवाढ मिळूनही या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. शिक्षक संघटनांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुढाकाराने ही प्रक्रिया तिसऱ्यांदा सुरु झाली. मात्र तीदेखील लाल फितीच्या कारभारात अडकली आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न महाराष्ट्रात नेहमीच गाजतो. त्याला हे वर्ष सुद्धा अपवाद राहिले नाही. भाजप सरकारने ऑनलाइन बदल्यांचा कायदा आणून मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या. त्यातील संवर्ग पद्धतीमुळे न्यायालायने देखील त्यास मान्यता दिली. सलग दोन वर्षे त्याप्रमाणे बदल्या झाल्या. मात्र करोनामुळे शासनाने बदल्या थांबवल्या. ऑनलाइन पद्धतीने बदल्या झाल्याने अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. कारण सरकारने इतर खात्यांच्या बदल्या ऑगस्टअखेर उरकून घेतल्या.
त्यामुळे शिक्षक संघटना आणि सरकार यांच्यामध्ये संघर्षाचे वातावरण तयार झाले. तेव्हा शरद पवार यांनी त्यामध्ये मध्यस्थी करून सर्वच पात्र शिक्षकांच्या सरसकट बदल्या करण्यापेक्षा जे शिक्षक नव्याने बदलीस पात्र असणारे दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त, मतिमंद मुलांचे पालक, सेवाज्येष्ठ व पती पत्नी एकत्रीकरण लागू असणारे शिक्षक व ऑनलाइन बदल्यात गैरसोय झालेले शिक्षक अशांच्या केवळ विनंती बदल्या करण्यात याव्यात असा तोडगा काढला. केवळ रिक्त पदी बदल्या होणार असल्याने व पर्यायाने कोणाचीही गैरसोय होणार नसल्याने सर्वांनी त्यास मान्यता दिली.
या बदल्या ऑनलाइन व राज्यस्तरावर होणार नसल्याने जिल्हा परिषद स्तरावर होणार असल्याने शासनाने अध्यादेश काढून तसे अधिकार जिल्हा परिषदांना बहाल केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यात याप्रमाणे विनंती बदल्या करण्यात आल्या; मात्र शरद पवार यांच्याच पुणे जिल्ह्यात शासनाने तब्बल दोन वेळा मुदतवाढ देऊन देखील जिल्हा परिषद प्रशासनास या बदल्या विहित मुदतीत पूर्ण करता आल्या नाहीत.
शिक्षक संघटनांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुढाकाराने ही प्रक्रिया तिसऱ्यांदा सुरु झाली. ती पुन्हा लाल फितीच्या कारभारात अडकली. ज्यांच्या शब्दावर महाराष्ट्र नव्हे; तर देशाची सूत्रे हलतात अशा शरद पवार यांच्या शब्दाला त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेली पुणे जिल्हा परिषद वाटाण्याच्या अक्षता लावणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अपंग कर्मचारी कल्याण महासंघ पुणे शाखेने याबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेणार
दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त, मतिमंद मुलांचे पालक, सेवाज्येष्ठ व पती-पत्नी एकत्रीकरण लागू असणाऱ्या शिक्षकांच्या विनंती बदल्या न केल्यास त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे आहे. असे निवेदन शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाने आमदार अशोक पवार यांना दिले आहे. याप्रकरणी सखोल लक्ष घालून लवकरच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिल्याचे तालुकाध्यक्ष संतोषकुमार थोपटे यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शिक्षक बदल्यांना स्थगिती मिळाली आहे. शिक्षकांचा आमच्याकडे पाठपुरावा होत असल्याने याबाबत आम्ही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली व बदल्यांबाबत प्रस्ताव दिला आहे. राज्य सरकारकडून तशी परवानगी मिळाल्यास बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येईल.
-रणजित शिवतरे, जि. प. उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती