कुरवली -इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरा नदीलगतच्या तावशी, जांब, कुरवली, चिखली, कळंब परिसरातील नागरिकांची लॉकडाऊन संपण्यापूर्वीच पुणे – सोलापूर जिल्ह्यात नागरिकांची ये – जा करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हा बंदीसह विविध नियमांचे बंधन घालून नागरिकांना सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु लॉकडाऊन संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाच निरा नदीलगतच्या गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी काही दम निघत नसल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे.
निरा नदीलगत असलेल्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील नागरिक अनेकदा किरकोळ कामासाठी व नदीलगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात शेतीकामासह अन्य कामासाठी ये-जा करत आहेत.
शासनाच्या जिल्हाबंदी निर्णयानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी पास, वैद्यकीय प्रमाणपत्र, ओळखपत्र तपासणीचे दिव्य पार करून जावे लागते आहे. या सर्व नियमांना बगल देत दोन्ही जिल्ह्यातील नागरिक छुप्या पद्धतीने बंधारा अथवा नदीतून धोकादायक पद्धतीने प्रवास करीत आहेत. अनेकदा असा प्रवास करताना नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
नियम तोडून हाडे मोडल्याने तक्रार कुठं करायची
या भागात छुप्या पद्धतीने नियम तोडून हाडे मोडल्याने तक्रार कोणाकडे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक याबाबत शब्द काढायला तयार नाहीत. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांचे रस्ते नागरिकांना खुले करण्यात येणार आहेत. परंतु त्यांची वाट न पाहता नियम मोडणाऱ्या नागरिकांना अपघातात हाडे मोडून घेण्यासाठी घाई झाली असल्याची चर्चा स्थानिक नागरिक करीत आहेत.
जनतेच्या हितासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी विनाकारण तसेच नियम तोडून या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात तसेच या गावातून त्या गावात ये-जा करू नये. यामुळे या महामारीमुळे आपला जीव धोक्यात येऊ शकते. शासनाने करोनाशी लढाई जिंकण्यासाठी नागरिकांना दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
– विलास कणसे, पोलीस पाटील, कुरवली.