नवी दिल्ली – “यास’ चक्रीवादळामुळे उदभवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत सज्जता, नुकसानीचे मूल्यांकन आणि संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला.
पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यात प्रत्येकी 46 पथकांसह “एनडीआरएफ’ची सुमारे 106 पथके तैनात करण्यात आली होती आणि त्यांनी 1000 हून अधिक लोकांची सुटका केली आणि रस्त्यावर पडलेली आणि वाहतुकीला अडथळे आणणारी 2500 हून अधिक झाडे/खांब बाजूला करत मार्ग मोकळा केला.
नौदल आणि हवाई दल दक्ष असताना, लष्कर आणि तटरक्षक दल या संरक्षण दलांच्या जवानांनी अडकलेल्या माणसांची सुटका केली. “यास’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा राज्ये घेत आहेत.
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार चक्रीवादळग्रस्त भागात राज्ये आणि केंद्राच्या संस्थांनी नागरिकांचे वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले, त्यामुळे जीवीतहानी किमान राखता आली. त्याचवेळी पूरामुळेही काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे, त्याचेही मुल्यांकन सुरु आहे. वादळग्रस्त भागांपैकी अनेक ठिकाणी वीज आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
प्रभावित भागातल्या आव्हानांचा सामना करणाऱ्या राज्ये आणि केंद्रीय संस्थांच्या प्रभावी, कार्यतत्पर भूमिकेची पंतप्रधानांनी दखल घेतली. प्रभावित भागातले जनजीवन पूर्वपदावर यावे, ते सुरळीत व्हावे, तिथल्या जनतेला दिलासा मिळावा याची काळजी घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी संबंधितांना दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 28 मे रोजी ओदिशा आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार असून चक्रिवादळाने प्रभावित भागाचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.