महापालिकेत भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा : राज्याच्या सत्ता समीकरणात हाच फॉर्म्युला अवतरला
नगर – वर्षभरापूर्वी डिसेंबर महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर सत्तेचा सोपान चढविण्यासाठी बहुमताचा जादूई आकडा नसतांनाही केवळ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या फॉम्युल्यामुळे भाजपचा महापौर झाला होता. आता तो फॉर्म्युला राज्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामुळे अवतरला आहे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आ. जगतापांनी हे पाऊल उचलले होते. आता तो फॉर्म्युला राज्यात सत्ता समिकरणात राबविला गेल्याचे दिसत आहे.
महापालिकेच्या डिसेंबर 2018 मध्ये निवडणूक झाली. यामध्ये 68 पैकी शिवसेनेला सर्वाधिक 24 जागा मिळाल्या होत्या. त्याखालोखाल राष्ट्रवादीला 18, भाजपला 14, कॉंग्रेसला 5, बसपला 4, अपक्ष 2 आणि समाजवादी पक्षाला 1 जागा मिळाली होती. सर्वाधिक 24 जागा मिळवूनही भाजपने शिवसेनेला सोबत न घेता राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापौरपद पटकावले. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 18 सदस्यांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दिला.
यावेळी कॉंग्रेसच्या पाच नगरसेवकांनी अनुपस्थित राहून भाजपला अप्रत्यक्ष साथ दिली होती. त्यावेळी महापौरपदावरून शिवसेना व भाजपमध्ये वाद सुरू होता. सर्वाधिक जागा शिवसेनेच्या असल्याने शिवसेनेचा महापौर होणार असा दावा करण्यात आला होता. पण त्याबाबत भाजपशी बोलण्यात शिवसेना तयार नव्हती. भाजपने युतीचा प्रस्ताव ठेवला तर पाहू अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला पाठिंबाचा हात पुढे केला. तो भाजपने स्वीकारला.
त्यावेळी स्थानिक नेत्यांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील या अभ्रद मान्यता दिली होती. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर आहे. आ. जगताप यांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावरून प्रत्यक्षदर्शनी आ. जगताप नसल्याने राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांसह नगर शहरजिल्हाध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या निर्णयाबद्दल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. तब्बल तीन महिने नगरसेवक पक्षातून बाहेर होते.
परंतु नंतर बदल्या राजकीय समिकरणात राष्ट्रवादीने आ. जगताप यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर पक्षाने केलेली कारवाई मागे घेवून सर्व पदाधिकारी, नगरसेवकांना पक्षात पुन्हा घेतले. मात्र महापालिकेत भाजपला असलेला पाठिंबा मात्र कायम ठेवला आहे. आता तो आ. जगताप यांचा फॉर्म्युला राज्याच्या सत्ता समिकरणात स्वीकारण्यात आला असल्याचे आज सकाळी मुंबईतील घडमोडीने आढळून आले. नगरमध्ये ज्या पद्धतीने भाजप व राष्ट्रवादी अशी आघाडी झाली. तशीच आता राज्याच्या राजकारणात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तरी या सत्ता समिकरणामुळे नगर शहरात भाजप व राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.