मुंबई – देशात सध्या सुडाचे राजकारण सुरू आहे. आमचे हिंदुत्व हे सुडाचे राजकारण करणे नाही. त्यात देशाचे काय होईल, याचा विचार कुणी तरी करायला हवा होता. तो आम्ही करत आहोत. बदला घेणारे आणि सुडाचे राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर हल्लाबोल केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे आनंदाने स्वागत केले. आम्ही बऱ्याच दिवसांपासून भेटणार होतो, आज तो दिवस उजाडला. कालच शिवाजी महाराज यांची जयंती झाली, त्यानंतर आज आमची भेट झाली, आम्ही काही लपवले नाही. आतमध्ये काही बोलायच आणि बाहेर आल्यावर, नाही-नाही सदिच्छा भेट होती, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला.
सध्या देशाचे वातावरण गढूळ झाले आहे. अत्यंत खालच्या पातळीला राजकारण सुरू आहे. सुडाचे राजकारण ही काही देशाची परंपरा नाही. आमचे हिंदुत्व हे सूडाचे राजकारण करणारे नाही. त्यात देशाचे काय होईल. याचा विचार कुणी तरी करायला हवा होता. तो आम्ही करत आहोत. बदला घेणारे आमचे राजकारण नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
हे जर असेच सुरू राहिल्यास देशाचे काय होईल. देशाला काही भवितव्य आहे की नाही. मागील पानावर पुढील पानावर सुरू असेल तर काही खरे नाही. याचा विचार कुणी तरी केला पाहिजे होता. आजपासून आम्ही विचार करायला सुरुवात केली आहे. राज्या-राज्यात चांगले वातावरण राहिले पाहिजे. राज्य गेले खड्यात, देश गेला खड्यात असा विचार करून चालणार नाही. एकमेकांना खड्यांत टाकण्याचे उद्देश नको. चांगले विचार करून आम्ही नवीन सुरुवात करत आहोत. याची सुरुवात केल्यानंतर मेहनत करावी लागणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी काय केले याबद्दल कुणी बोलत नाही, पण तुम्ही कितीही चांगलं केले ते खोट लोकांना सांगण्याचे काम सुरू आहे, हे आता मोडून काढले पाहिजे, यासाठी आम्ही चांगली दिशा ठरवली आहे, त्यादृष्टीने आम्ही पाऊल टाकले असल्याचे त्यांनी सांगितले.