कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर जो हिंसाचार झाला त्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामार्फत चौकशी करण्याचा जो आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे, त्या आदेशाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी करणारी याचिका बंगाल सरकारच्या वतीने हायकोर्टात करण्यात आली होती. पण ती याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
बंगालमध्ये आपल्यावर हल्ला झाल्याच्या तक्रारी करणाऱ्या अनेक याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. या राजकीय दहशतवादामुळे अनेकांना या राज्यातून स्थलांतरित व्हावे लागले आहे, अशाही तक्रारी या याचिकांमध्ये करण्यात आल्यानंतर या प्रत्येक प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामार्फत चौकशी करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता.
दरम्यान, पश्चिम बंगाल राज्य विधी प्राधिकरणाच्या वतीने या हिंसाचाराच्या संबंधात कोर्टात अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात त्यांनी या हिंसाचाराचा 3243 जणांना फटका बसल्याचे नमूद केले आहे.