नवी दिल्ली – करोनाच्या साथीच्या कठीण काळात योग हा लोकांसाठी सामर्थ्य आणि संयम यांचा मोठा स्रोत बनून राहिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने योगाने पार पाडलेल्या भूमिकेबद्दल मोदी यांनी आज आपले विचार मांडले. सातव्या जागतिक योगदिनानिमित्त त्यांनी आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला.
जगातील अनेक देशांच्या संस्कृतीमध्ये योग हा अविभाज्य घटक म्हणून अंतर्भूत नसल्यामुळे साथीच्या काळात अनेक देशांतील जनतेला योग दिनाचे विस्मरण होणे साहजिक आहे, पण त्याऐवजी योगाबद्दल जगात असलेली उत्सुकता वाढली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये धैर्य राखायला मदत करणे हा योगाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा जगात साथीची सुरुवात झाली तेव्हा तिच्याशी लढण्यासाठी क्षमता, स्रोत आणि मानसिक खंबीरतेच्या बाबतीत कोणीही तितकेसे सज्ज नव्हते. संपूर्ण विश्वात पसरलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी आवश्यक विश्वास आणि सामर्थ्य गोळा करण्यासाठी योगसाधनेने लोकांना मदत केली, असे त्यांनी सांगितले.
आघाडीवरील करोना योद्ध्यांनी कशा प्रकारे त्यांचे संरक्षक कवच म्हणून योगाचा वापर केला आणि योगसाधनेच्या माध्यमातून स्वतःला कसे मजबूत करून घेतले आणि करोना विषाणूचे रुग्णांवरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिकांनी योगाची कशा प्रकारे मदत घेतली, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.
रुग्णांसाठी डॉक्टर आणि परिचारिकांनी रुग्णालयांमध्ये योग सत्रांचे आयोजन केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या दिसून आल्या. आपली श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी प्राणायाम तसेच अनुलोम-विलोम यांसारख्या श्वसनाच्या व्यायामाचे महत्त्व अनेक तज्ज्ञ सर्वांना अधोरेखित करून सांगत आहेत, याचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी केला.
योगाचार्य, योगप्रचारक आणि योगाभ्यासाशी संबंधित प्रत्येकाने योगशास्त्र, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. आपल्या भाषणात भगवद्गीतेतील वचन उद्धृत करत ते म्हणाले की, योगामध्ये सर्व समस्यांचे समाधान आपल्याला सापडते, त्यामुळेच आपण योगाभ्यासाचा हा एकत्रित प्रवास असाच निरंतर सुरू ठेवायला हवा.
योगाभ्यासात लोकांची रुची वाढत असून, हे शास्त्र आता लोकप्रिय होत असल्याचे नमूद करत पंतप्रधान म्हणाले की, योगशास्त्राची मूलभूत सूत्रे आणि गाभा कायम ठेवत, हे शास्त्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योगाचार्य आणि आपण सर्वांनीच या कामात आपले योगदान देऊन योग समस्त लोकांपर्यंत पोचवायला हवा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.