कोलकाता :- पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी पंचायत निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार होत होता. हे थांबवण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाने 15 जून रोजी केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, बंगाल सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने या निर्णयाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले. त्यावर कोर्ट 20 जून म्हणजेच मंगळवारी सुनावणी घेणार आहे.
पंचायत निवडणुकीच्या संदर्भात रविवारी कूचबिहारच्या साहेबगंजमध्ये भाजप उमेदवार विशाखा दास किस्मत यांचे नातेवाईक शंभूदास यांची हत्या करण्यात आली. भाजपने या हत्येसाठी टीएमसीला जबाबदार धरले आहे. 17 जून रोजी साहेबगंजमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला होता.
प्रामाणिक हे साहेबगंज येथील ब्लॉक कार्यालयात जात होते. या ठिकाणी उमेदवारांच्या छाननीचे काम सुरू होते. यापूर्वी मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथे तृणमूल कॉंग्रेस नेत्याच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. मुस्तफा शेख याला बेदम मारहाण करण्यात आली. टीएमसीने शेख यांच्या हत्येचा आरोप भाजप समर्थकांवर केला होता.
8 जुलैला निवडणूक….
पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी एकाच दिवशी पंचायत निवडणुका होणार आहेत. 11 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. 15 जून रोजी संपलेल्या 9 जूनपासून उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले होते.