इंदापूर – सध्याचे सरकार अस्तित्वात आणण्यांमध्ये सिंहाचा वाटा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने उचलला असताना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येक निवडणुकीत मनापासून साथ दिली असताना, मित्र पक्ष म्हणून आम्हाला गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सत्तेचा वाटा दिला जात नाही. त्यामुळे पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने इंदापूर येथील शासकीय विश्रामधाम येथे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. कवाडे म्हणाले, राजकीय कुरघोड्या करण्याची या पक्षाला सवय नाही. अगदी सरळ मार्गाने, सामान्य जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी उपेक्षितांसाठी काम हा पक्षाचा अजेंडा आहे.
नवीन मित्र पक्षाची बोलणे सुरू आहे यामध्ये शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. सन्मानपूर्वक गटबंधन झाले तर व आमच्या पक्षाच्या अजेंड्याशी सहमती दर्शवली तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी आघाडी करेल, अन्यथा निवडणुका जिंकण्यासाठी ज्यांनी आमचा उपयोग करून घेतला व शब्द पाळला नाही त्यांना धडा शिकवण्यासाठी पार्टी सज्ज आहे.
इंदापूर तालुक्यातील लूटमार थांबणार का
इंदापूर तालुक्यामध्ये अवैध भिशी चालक, उजनी जलाशयाला ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. त्यांच्यावर अन्याय तसेच वन विभागाकडून नाहक गोर – गरीब कुटुंबांना त्रास, ही अनोखी लुटमार इंदापूर तालुक्यात कशासाठी शासनाच्या माध्यमातून चालले आहे ? असा सवाल प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला. लूटमार थांबणार नसेल तर उघडपणे गोरगरीब जनतेच्या पाठीशी पीपल्स रिपब्लिकन पार्टी उभी राहील.