लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणच्या प्रचारसभांमध्ये बोलताना मागील सरकारांवर त्यांच्या काळातील भ्रष्टाचारावर जोरदार आसूड ओढले. या सरकारांनी राज्याची तिजोरी रिकामी केली.आज गरिबांना मिळणारे रेशन पूर्वी समाजवादी पक्षाच्या गुंडांनी खाऊन टाकले होते, असा आरोपही त्यांनी केला.
बहुजन समाज पक्षावरही त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बहेनजींच्या हत्तीचे पोट इतके मोठे होते की कितीही खाल्ले तरी त्याचे पोटच भरत नव्हते, अशा शब्दांत त्यांनी मायावतींवरही टीका केली.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या एका खास मुलाखतीत आदित्यनाथ म्हणाले,आम्ही आज गरिबांच्या घरी रेशन पोहोचवत आहोत. पूर्वी हे सरकारी रेशन समाजवादी पक्षाचे गुंड खात असत. बसपाचा हत्ती तर काहीही खाऊन पचवत होता, असे ते म्हणाले.
राज्यातील सपा सरकारच्या कार्यकाळात राज्याच्या निधीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आदित्यनाथ म्हणाले की, अखिलेश झोपेत आणि स्वप्नात व्यस्त असल्याने या गोष्टींचा विचार करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नसावा.
12-12 तास झोप, मित्रांबरोबरचे बागडणे, अशा बाबींतच अखिलेश यांचा वेळ गेला, त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे कोणताचे डेटा शिल्लक नव्हता, असा दावाही त्यांनी केला.