भुवनेश्वर – ओडिशातील जनता या राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत बीजू जनता दल आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना धडाशिकवेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ओडिशात यंदा भाजप प्रचंड बहुमताने विजयी होईल आणि आश्चर्यकारक निकाल तेथे लागेल असा दावा मोदींनी केला आहे. सुंदरगड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ओडिशात लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक होत असून ही निवडणूक 11 ते 29 एप्रिल या दरम्यान चार टप्प्यात होणार आहे.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही येथे हे यश मिळवू. भाजपचे कार्यकर्ते देशाच्या विविध भागात गेली अनेक दशके समर्पित भावनेतून काम करीत आहेत. केरळ सारख्या राज्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा रोजच हत्या होत आहेत परंतु तरीही आमचा पक्ष तेथे भक्कमपणाने या दहशतवादाशी लढत देत आहे. देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच आपल्या प्राणाची बाजी लावली आहे असे ते म्हणाले. केंद्राने ओडिशातील जनतेच्या विकासासाठी भरपुर निधी दिला पण त्याचा योग्य तो वापर येथील बीजेडीच्या सरकारने केला नाही असे ते म्हणाले.