करोनामुळे लॉकडाऊन झाले असताना मनाच्या बंदिस्त कोपऱ्यातील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ते अत्यंत हादरवणारे आहे. आपला प्रवास विकृतीकडे किती वेगाने होतो आहे, ते निदर्शनास आणणारे आहे. दिल्लीतील एक घटना यामागचे निमित्त ठरली आहे. येथील उच्चभ्रू भागातील शाळेतील ही घटना आहे. तेथे शिकणाऱ्या मुलांनी “बॉईज लॉकर रूम’ नावाचा कथित ग्रुप बनवला आहे. या ग्रुपवर ते शाळेतील मुलींचे फोटो टाकत होते. त्यात छेडछाड केली जात होती. इतकेच नव्हे तर या मुलींवर बलात्कार करण्याच्या योजनांची चर्चा करण्यापर्यंत ते धजावले होते.
माहिती तंत्रज्ञानाचा दुरूपयोग किती विध्वंसक ठरू शकतो याची जाणीव करून देणारे हे काळे वास्तव. ज्या वयात नव्या विचारांची कास धरण्याची आणि स्वप्नांना पंख देण्याची गरज असताना आपले भवितव्य कायमस्वरूपी काळोखाने व्यापून टाकणाऱ्या मार्गावर नेण्याचाच हा प्रकार. एका मुलाचे त्याच्या मैत्रिणीशी बिनसल्यानंतर तिला प्रताडीत करण्याची विकृत योजना त्याच्या मनात आली. आपल्या ग्रुपवरच्या मित्रांशी त्याने ती शेअर केली. हा प्रकार एका मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याचे बिंग फोडले. आता प्रकरण महिला आयोगापर्यंत पोहोचले आहे. दिल्लीतीलच अन्य एका घटनेत एका मुलानेच तो पीडित असल्याचा आरोप केला. नंतर या मुलाने आत्महत्या केल्याची बातमी आहे. साधारण दशकभरापासून अशा स्वरूपाच्या बातम्या अमेरिकेतून येत होत्या. एखाद्या आजी किंवा माजी विद्यार्थ्याने कोणतीतरी वेशभूषा करून शाळेत गोळीबार करण्याच्या घटना तेथे बऱ्याचदा घडल्या आहेत. त्यात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. हत्या करणारा विकृत होता का याचा बऱ्याच घटनांत उलगडा झाला नाही. मात्र विकृतीकडेच इशारा करणारी ही कृत्ये होती. कोणी केली, का केली व त्यामागचा हेतू काय यावर चर्चा झाल्या नाहीत. झाल्यात तरी त्याला ठळकपणे समोर येऊ दिले नाही.
अमेरिकेतील आणखी एक घटना म्हणून हे प्रकार नंतर विस्मृतीत गेले. संपन्नता आली की रोजच्या जगण्याची भ्रांत मिटते. जेव्हा डोक्याला काही खाद्य नसले की त्यातून मग अशा आत्मघाती आणि समाजघाती कल्पना जन्माला येतात. त्यात विनाकारण असंख्य जीव पोळले जातात. अमेरिकेत बंदुकीचे लायसनही सहज मिळते. इतक्या घटना घडून आणि त्यावर प्रचंड ओरडा होऊनही याबाबतची नियमावली काही बदलली नाही. कोणीतरी माथेफिरू बंदुक मिळवतो आणि अन्य लोकांवर गोळीबार करतो हा प्रकार ठराविक काळाने आजही तेथे घडतो. प्राप्त करण्यासारखे काही राहिले नसल्यावर आयुष्यात काहीतरी थ्रील असले पाहिजे या मूर्खपणातून हे प्रकार घडले किंवा घडतात.
भारतही आता त्या वाटेने चाललाय का, असा प्रश्न आता दिल्लीतील प्रकरणावरून उपस्थित होतो आहे. संपन्नता हे एकच यामागचे कारण नाही. एकाकीपणा, दुर्लक्ष, पालकांकडे मुलांसाठी वेळ नसणे आणि सोशल मीडियावरील सतत आव्हान देणारे खुले काळे जग हीही त्यामागची अन्य कारणे. मुलांना परिपक्वता येण्याच्या आतच ज्या त्यांच्यासाठी नाहीत त्या गोष्टी त्यांच्या हातात आल्या आहेत. मोबाइल अथवा त्याद्वारे उपलब्ध होणारी माहितीची दालने येथे अभिप्रेत नाही. तर कोणत्या दालनात प्रवेश करायचा आणि त्यातून काय घ्यायचे व कोणत्या दालनाकडे दुर्लक्ष करायचे या मार्गदर्शनाचा अभाव ही प्रमुुख समस्या ठरली आहे. आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे असल्यास मुलांना वेळ देऊ शकत नाहीत हे सत्य.
काही प्रकरणांत आपली श्रीमंती वाढविण्याच्या नादात मुलांना घरातच आयसोलेट करणारे पालकही आहेत. अशात एकाकी पडलेले, कुटुंबातील कोणाचा धाक नसलेले मूल आभासी जगतात अधिकाधिक गुरफटत जाते. आज असंख्य साइट्स आणि ऍप्स् अशी आहेत की तेथे क्रिएटीव्हीटीच्या नावाखाली छचोरपणालाच उधाण आले आहे. स्वत:चा व्हिडिओ तयार करायचा आणि त्यावर आपल्यासारख्याच लोकांच्या लाइक्स मिळवायच्या नादात आपण किती भरकटलो आहोत, याचे भानच राहत नाही. बरे यात कोणताही विषय वर्ज्य नाही. प्रत्येक विषयाला अश्लीलतेचा आणि सवंगतेचा घाण वास. शब्दांची यथेच्छ मोडतोड करत पेरले गेलेले विनोद आणि त्याला साजेशे अंगविक्षेप. वयानुुरूप समजूनही न येणाऱ्या प्रेम उदात्त भावनेचा तर अक्षरश: बाजार मांडला जातोय. मुलगी अथवा स्त्री ही तर उपभोग्य वस्तू झाली आहे. पती पत्नीचे संबंध इतक्या खालच्या स्तरावर जाऊ शकतात आणि नात्यांतील संवाद इतका गलीच्छही असू शकतो हे अशा माध्यमांवर फेरफटका मारल्यावर लक्षात येते.
या सगळ्या प्रकारामुळे कोणत्याही गोष्टीचे महत्त्व आणि पावित्र्य हरवले आहे. तंत्रज्ञानाने आपल्या हाती काही आले असेल तर प्रगतीला पोषक कसे ठरेल याचा विचार होणे गरजेचे आहे. मात्र घरांतून चित्र काय दिसते? एका घरात तीन किंवा चार व्यक्ती एकत्र असल्यातरी परस्परांपासून अलिप्तच असतात. प्रत्येकाच्या हातात मोबाइल आणि समाजमाध्यमांतून हरवलेले चार चेहरे चार दिशांना तोंड करून बसलेले हमखास दिसतात. माध्यम मग ते कितीही बदनाम असू देत, ते वापरात आले असेल तर निरूपयोगी असूच शकत नाही. समाजमाध्यमाला लाख दोष चिकटले असतील. मात्र त्याची काही मूलभूत वैशिष्ट्येही आहेत. माणसाला जगाशी जोडण्यापासून ज्ञानाची अथांग दारे खुली करण्यापासून आणि विवंचनेत असणाऱ्या व्यक्तीला क्षणभर विरंगुळा देण्यापासून ते आपले दु:ख घटकाभर विसरायला लावण्यापर्यंत त्याचे बरेच उपयोग आहेत. रोजच्या व्यवहारात तर अन्य असंख्य कामे त्यामुळे विनासायास पार पडत असतात. फक्त या माध्यमाचा वापर करणारा कोण आहे व तो चौखुर उधळलेला नाही ना हे पाहणे आवश्यक असते.
दिल्लीत जो प्रकार घडला, तसाच प्रकार मध्यंतरी मुंबईतही घडला होता. अन्यत्रही घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जे प्रकरण समोर येते त्यावर चर्चा होते. जे झाकलेले राहते त्याची वाच्यता होत नाही. ज्या मुलांना या प्रकरणात चौकशीसाठी बाजूला घेण्यात आले आहे, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचे स्वत:चे निरागस चेहरेही चकीत करणारेच आहेत. सध्याच्या वातावरणात त्यांचा जगाशी शारीरिक संपर्क तुटला असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केले असावे असे मानण्याचे धाडसही करता येत नाही. त्याला कारण लॉकडाऊनमुळे त्यांना बंदिस्त केले असेल. पण त्यांच्या मनात ज्या विचारांनी आणि त्यातून निर्माण झालेल्या विकारांनी जी भरारी घेतली आहे, ती धडकी भरवणारी आहे. हा आजार जुना आहे. त्याच्याकडे व्यक्तीश: लक्ष देणे आणि तातडीने लक्ष देणे हाच यावर उपाय आहे.