आळंदी (ज्ञानेश्वर फड) – टाळ- मृदंगाचा गजर, ग्यानबा तुकारामांचा जयघोषात आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने रविवारी (दि. 11) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. दरम्यान, पहाटेपासूनच इंद्रायणी काठावर वैष्णवांची मांदियाळी बघायला मिळाली होती. माऊली मंदिरातील विणा मंडपातून रविवारी (दि. 11) सायंकाळी पाऊणे सातच्या सुमारास झाले. सोमवारी (दि.12) श्रींचा पालखी सोहळा गांधी वाड्यातील आजोळघरी गांधी परिवारातर्फे पाहुणचार घेत पुण्यातील दोन दिवसांचे मुक्कामास भल्या पहाटे प्रयाण होणार आहे.
देवस्थानने प्रस्थान सोहळा थेट प्रक्षेपण सोय केल्याने मोठी पर्वणी भाविक,नागरिकांना लाभली. घरी राहून सुरक्षित पणे आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेतला. दिंडीकरी आणि खांदेकरी यांचे मंदिर प्रवेशाचे संख्येवर नियंत्रण आणल्याने ग्रामस्थ आणि दिंडीतील वारकरी यांच्यात नाराजी होती. प्रस्थान दिनी माऊली मंदिरात पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश मच्छिंद्र चांडक, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजी शितोळे, पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील, माजी विश्वस्त सुधीर पिंपळे, डॉ. प्रशांत सुरू, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, माजी विश्वस्त डॉ.अभय टिळक, तहसीलदार वैशाली वाघमारे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, रामभाऊ चोपदार, फडकरी, दिंडीकरी, मानकरी यांचे उपस्थितीत झाले.
अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास दुपारपर्यंत सोय करण्यात आली होती. श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी गर्दी केली. दरम्यान नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रींना महानैवेद्य झाला. मंदिरात सेवेकरी व स्वकाम सेवक यांनी स्वच्छता स्वयंसेवक यांचे माध्यमातून सेवा रुजू केली. मंदिर प्राकार व श्रींचा गाभारा प्रस्थानपूर्व स्वच्छ करण्यात आला. सेवाभावीवृत्तीने सेवकांनी आपली सेवा रुजू केली.
सोहळ्यास यावर्षी परंपरेने सुरुवात झाली. श्रींचे मंदिरात माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने श्रीनां वैभवी पोशाख झाल्यावर श्री गुरू हैबतरावबाबांच्या वतीने माऊलींच्या समाधीची परंपरेने आरती हरिनाम गजरात झाली. त्यानंतर माउली संस्थांनतर्फे श्रींची आरती झाली. श्रींचे वैभवी चांदीचे पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथऱ्यावर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. श्रींचे चलपादुकांची विधिवत प्रतिष्ठापना झाली. श्रींचे संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थानच्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. श्रींचे चलपादुका देवस्थानतर्फे पालखी सोहळ्याचे मालक आरफळकर यांचेकडे देण्यात आल्या. आरफळकर यांचे नियंत्रणात श्रींचे पादुका पालखीतून मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. श्रींचे वैभवी चलपादुका मालकांकडे हरिनाम गजर करीत पालखीत विधिवत पूजा झाली. श्रींची पालखी आळंदीकर ग्रामस्थांनी माऊली माऊली असा नामजयघोष करीत खांद्यावर उचलीत वारीला जाण्यास वीणा मंडपातून सायंकाळी पंढरीकडे प्रस्थान ठेवले.
पादुका पालखीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी सोहळा आजोळ घरालगतच्या जुन्या रामवाड्याचे गांधी वाड्यात दर्शनबारी सभागृहात गजरात आणण्यात आल्या. येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा विसावला.