मुंबई – केंद्र सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.2 टक्के म्हणजे 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज गेल्या पंधरवड्यात जाहीर केले आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती पाहता हे पॅकेज पुरेसे नसल्यामुळे विकास दर 5 टक्क्यांनी कमी होणार असल्याचा दावा एस ऍण्ड पी या पतमानांकन संस्थेने केला आहे.
यासंदर्भात विश्लेषण करताना या संस्थेने म्हटले आहे की, भारतामध्ये सेवा क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा जास्त आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सेवा क्षेत्र पूर्णतः कोलमडले आहे. सेवा क्षेत्रातील बरेच कर्मचारी कार्यस्थळावर नाहीत. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र स्थलांतरीत कामगारावर अवलंबून आहे. हे स्थलांतरित कामगार आपल्या गावी निघून गेले आहेत किंवा जात आहेत.
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र रुळावर येण्यास बराच काळ लागणार आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरील वाहतूक बंद असल्यामुळे पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. लॉक डाऊन काढले असले तरी आणखीही काम पूर्वपदावर आले नाही.
लॉक डाऊननंतर संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत असल्यामुळे पूर्ण क्षमतेने कंपन्या आणि कामगार काम करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या वर्षीचा विकास दर 5 टक्क्यांनी कमी होईल असे या संस्थेला वाटते.
गेल्या वर्षाचा विकास दरही अकरा वर्षाच्या नीचांकी पातळीवर जाऊन केवळ 4.2 टक्के नोंदला गेलेला आहे. मात्र यासाठी जाहीर केलेले पॅकेज पुरेसे नाही असे या संस्थेला वाटते.