माणसाचा स्वभाव हा फार विचित्र आहे. त्याला प्रत्येक गोष्ट ही त्याच्या मनाप्रमाणे आणि तीही तो म्हणेल तेव्हा आणि तशीच व्हावी, असे वाटत असते. पण ते काही घडत नाही, घडणारही नसते, मग अशा वेळी काय करायला हवे हे सांगताना, साधू, संत आणि सत्पुुरुष आपल्याला थोडी वाट पाहायला, सबुरी धरायला सांगतात.
शिर्डीच्या साईबाबांचा तर हाच सांगावा होता की, “बाबांनो! तुम्ही तुमच्या सुखी आणि समाधानी जीवनासाठी श्रद्धा आणि सबुरी राखा’. सबुरी राखा म्हणजेच काय करा? तर “वेट अँन्ड वॉच’. घाई, धावपळ न करता वाट पाहा आणि काय घडतेय ते साक्षीने पाहा.
आपला हा सबुरीचा संदेश लोकांना देताना बाबा अगदी सहज पटणारी व्यवहारातली उदाहरणे देत. ते म्हणत, “बाबारे! आज बी पेरली तर उद्या लगेच झाड उगवते का? नाही ना? त्यासाठी आवश्यक तो काळ द्यावाच लागतो. त्या काळात त्याची काळजी घ्यावी लागते, तरच भविष्यात उत्तम आणि चांगली फळे पदरात पडतात. होय की नाही? मग देवाची आज पूजा केली, त्याच्याकडे काही मागणी केली तर ती मात्र त्याने लगेच पूर्ण करायाला हवी, असा आग्रह का? इथे पण थोडी वाट पाहायला, सबुरी राखायला नको का?’
“सबुरी का फल मीठा होता है!’ आंबा आहे, खाणाराही तयार आहे; पण तो आंबा पूर्णपणे पिकायला नको का? तोवर वाट पाहायला नको का? पण माणसाचं कसं असतं, त्याला शिजेपर्यंत दम असतो; पण तो ताटातला पदार्थ निवे पर्यंत वाट पाहत नाही. परिणाम काय होते तर तोंड भाजते, जीभ पोळते.
भक्ताला भगवंत भेटतो पण कधी? तर भक्ताने त्याची खूप आतुरतेने वाट पाहिल्यावर, अशी वाट शबरीने पाहिली, भरताने पाहिली, ध्रुव, प्रल्हादाने पाहिली, तेव्हा त्यांना देव भेटला. घाईने कळ्याच तोडल्या तर फुलं कशी मिळणार? कच्ची फळं तोडली आणि चाखायची म्हटली तर त्याला तो गोडवा, ती माधुरी कशी येणार?
– अरुण गोखले