मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेऊन देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधील मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्व विरोधकांची बिहारमध्ये बैठक आयोजित केली. त्यानुसार शनिवारी बिहारच्या पाटण्यात विरोधी पक्षांचे प्रमुख नेते एकत्र आले आणि त्यांनी मोदी सरकारविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. विरोधकांच्या या बैठकीवर सत्ताधारी भाजपा आणि भाजपाचे इतर मित्रपक्ष वेगवेगळ्या प्रकारची टीका करत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्ताधारी आणि विरोधकांपासून लांब असला तरी मनसेकडून अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ मनसेकडून शेअर केला आहे. यात राज ठाकरे विरोधक आणि सत्ताधारी यांच्याबद्दल बोलले होते. ही मुलाखत साडेपाच वर्ष जुनी म्हणजे सप्टेंबर २०१७ रोजीचा आहे.
या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले होते की, “कोणाची सत्ता आज येते, कोणाची उद्या जाते, कोणा दुसऱ्याची सत्ता उद्या येते. परंतु ही सत्ता टिकवण्याचा सगळेजण प्रयत्न करत असत. राजकीय पक्ष, मग तो कुठलाही असो, तो पक्ष ती सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतो, मला माहितीय त्याप्रमाणे, विरोधी पक्ष हा कधीच जिंकत नसतो. सत्ताधारी हरत असतात. ज्या दिवशी तुमच्या हातात पूर्ण सत्ता येते ती त्या क्षणाला जायची सुरुवात देखील होते. आता सत्ता जायची ही जी गोष्ट आहे ती तुम्ही किती ताणताय एवढच तुमच्या हातात असतं, म्हणजेच ती सत्ता किती पुढे नेताय हेच तुमच्या हातात असतं.”
विरोधी पक्ष कधीही जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतात ! pic.twitter.com/Dgh2akhYRA
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 24, 2023
राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही ती सत्ता पुढे नेत असताना किंवा ती वाढवत असताना तुम्ही कुठलेही चुकीचे पायंडे पाडले नाहीयेत ना याचं तुम्हाला भान असलं पाहिजे. सत्ता टिकवण्यासाठी चुकीचे पायंडे पाडू नये याचं भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवलं पाहिजे. आजपर्यंत सत्ता टिकवण्यासाठी ज्या ज्या पक्षाने चुकीचे पायंडे पाडले ते आज हा देश भोगतोय. अगदी व्ही. पी. सिंह यांच्यापासूनची उदाहरणं घ्या. आपलं राज्य टिकवण्यासाठी, आपली सत्ता टिकवण्यासाठी आपण चुकीचे पायंडे देशात पाढतोय ज्याचा फटका पुढच्या पिढ्यांना बसेल. याची काळजी घेतली पाहिजे. कारण उद्या जेव्हा सत्ताबदल होईल तेव्हा आणि जे दुसरे सत्तेत येतील ते दुपट्टीने बदला घेतली.”
पुढे राज ठाकरे यांनी, पूर्वी राजकारणातील लोकांचे एकमेकांशी खूप चांगले संबंध असायचे. तुमच्या भूमिका एकमेकांना पटत नसतील, तुमच्या भूमिकांचा वाद असेल, त्या भूमिकांवर तुमचं राजकारण अवलंबून असेल किंवा तुम्ही त्या भूमिका घेऊन निवडणुका लढवत असाल तरीसुद्धा सर्व नेत्यांचे उत्तम संबंध होते. आज मात्र मला वाटतं कशा प्रकारचं वातावरण आहे त्याची तुम्हा सर्वांनाच कल्पना आहे.”असे म्हटले आहे.