टोकियो – ऑलिम्पिकच नव्हे तर कोणतीही स्पर्धा असो, ती देशवासीयांच्या तसेच खेळाडूंच्या जिवापेक्षा जास्त महत्त्वाची नाही, असे मत आता जपानमध्ये नागरिकांकडून व्यक्त होत आहे. देशात करोनाचा धोका अद्याप कायम असून त्यात दिवसेंदिवस वाढही होत आहे, अशा स्थितीत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येऊ नये, अशी विरोधाची मागणी जपानमध्ये जोर धरत आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास चार महिन्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. आयोजकांकडूनही स्पर्धेची तयारी वेगाने सुरू असून, जवळपास 90 टक्के तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक ज्योत रिलेही सुरू झाली असून, त्यात जवळपास दहा हजार धावपटू सहभागी झाले आहेत. दुसरीकडे जपानमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत टोकियोत स्पर्धा घेणे धोकादायक आहे असे सातत्याने सांगण्यात येत असून ही स्पर्धा या वर्षीही रद्द करा, अशी मागणीही जोर धरत आहे.
सध्याच्या स्थितीत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करून धोका पत्करण्यात अर्थ नाही. ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलैपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत सर्वसामान्यांना लस मिळेल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. ऑलिम्पिकसाठी हजारो परदेशी नागरिक जपानमध्ये येतील. यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. अशा वेळी त्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा आव्हानात्मक ठरेल. देशवासीयांच्या तसेच परदेशातून जपानमध्ये येत असलेल्यांच्या जिवापेक्षा स्पर्धा महत्त्वाची नाही, अशी मते नागरिकांनी व्यक्तकेली आहेत.
जपानमध्ये आतापर्यंत जवळपास 5 लाख जणांना करोनाची बाधा झाली आहे. रुग्णालयांवरील ताण वाढला असून, टोकियोसारख्या लोकसंख्या जास्त असलेल्या भागात आरोग्य यंत्रणांवरील ताण दुपटीने वाढला आहे. जपानमध्ये लॉकडाउन करण्यात आलेले नाही. मात्र, निर्बंध कडक करण्यात आले आहेत. अशा स्थितीत स्पर्धेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, या वर्षी ठरल्याप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धा होईलच, असा ठाम दावा जपान सरकार आणि जपान ऑलिम्पिक संघटना करत आहे. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी जवळपास 16 अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. तसेच या स्पर्धेसाठी बायोबबल तयार केले जाणार असून, त्यामुळे खेळाडू तसेच नागरिक सुरक्षित राहतील, असेही संघटनेकडून सांगण्यात आले असून कोणत्याही स्थितीत ही स्पर्धा होणारच, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
क्रीडा ज्योतीच्या रॅलीलाही विरोध
ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीची रॅली नुकतीच टोकियोपासून अन्य शहरांत सुरू झाली आहे. मात्र, आता या रॅलीलाही विविध शहरांतील महापौर तसेच नागरिकांनी विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. या रॅलीचा प्रवास सुरू असतानाच त्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.