– शर्मिला जगताप
परमेश्वराच्या पुत्राला सुळावर चढविले तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे. स्वतः कोणतेही पाप न करता, कोणतीही चूक न करता देवपुत्राला या भूतलावरील अज्ञानी माणसांनी सुळावर चढविले. मग हा गुड फ्रायडे कसा? याचे उत्तर बायबलमध्ये नवा करारात सापडते. मृत्यूवर विजय मिळवून येशू पुनरुत्थानित झाला म्हणून शुक्रवारच्या या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते. या दिवशी लोकांमध्ये प्रेम आणि विश्वास जागृत करणारे प्रभू येशू ख्रिस्तांची प्रार्थना केली जाते. गुड फ्रायडे या दिवशी प्रेम, सत्य आणि विश्वास या मार्गावर जाण्याची लोक शपथ घेतात.
“गुड फ्रायडे’च्या आधी चाळीस दिवस ख्रिस्ती बांधव उपवास करतात. “गुड फ्रायडे’चा दिवस हा एक्केचाळीसावा असतो. हा दिवस शांततापूर्ण वातावरणात आणि प्रार्थनेमध्ये घालवला जातो. अंधकार युगातून मानवाला बाहेर काढण्यासाठी परमेश्वराचा पुत्र येशूंचा जन्म झाला. त्यांच्या येण्याने या पृथ्वीवर एका नव्या युगाची सुरुवात झाली. लोकांमध्ये प्रेम व विश्वास राहिलेला नव्हता. अशावेळी पृथ्वीतलावर प्रभू येशूंनी प्रेमाचा अथांग सागर निर्माण करून मानवाला प्रकाशाची वाट दाखविली.
प्रभू येशू ख्रिस्त गुरुवारी रात्री आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे जेवण (लास्ट सपर) करत होते. त्यावेळी दुसऱ्या दिवशी आपणाला क्रुसवर चढवण्यात येणार असल्याचे त्यांनी त्यांच्या अनुयायांना सांगितले होते. दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी प्रभू येशू यांना क्रुसवर चढविण्यात आले. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी वेदना सहन करून आत्मबलिदान दिले. ज्यावेळी भूतलावरील लोकांनी येशूंना सुळावर चढविले.
त्यावेळीही प्रभू येशूंनी क्षमा, शांती, प्रेम आणि विश्वासाचा संदेश दिला. ते प्रभूकडे या सर्वांना क्षमा करण्याचे सांगतात. त्यामुळे एखाद्याने काही चूक केली असल्यास त्यास या दिवशी क्षमा करावी.
मृत्युदंड दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी त्यांचे पुनरुत्थान म्हणजे असलेल्या रूपात आणि देहात पुनर्जीवित झाले. म्हणून त्या दिवसाला “इस्टर संडे’ असे म्हटले जाते. याच दिवशी येशूंनी परत जन्म घेतला म्हणून हा दिवस ख्रिसमससारखाच पवित्र मानला जातो.
तुमच्याविषयी एखाद्याच्या मनात द्वेष असेल अशांनाही तुम्ही क्षमा करून तुमच्या मृदू संभाषणाने त्यांना आपलेसे करा, या येशूंच्या संदेशाची आज गरज निर्माण झाली आहे. येशूंनी संपूर्ण जीवन मानवाला जीवनाचे खरे ध्येय समजावून सांगण्यात घालविले. ज्या इस्रायलात जेरुसलेम येथे येशूंचा जन्म झाला तेथील धर्मग्रंथात न्याय आणि शिक्षेबद्दल असे सांगितले होते की, कुणी कोणाचा डोळा फोडला तर त्याचा डोळा फोडण्यात यावा. कुणी कोणाचा हात तोडला असेल तर त्याचा हात तोडण्यात यावा.
परंतु प्रभू येशूंनी मात्र आपल्या अनुयायास सांगितले, दुष्ट करतात तसे तुम्ही करू नका. तुम्ही शत्रूवर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रीती करा, हा जगावेगळा सल्ला कुणालाही पाळायला कठीणच आहे. मात्र, तरीही तुम्ही प्रेमाने शत्रूला जिंकू शकता, रागाला हरवू शकता, प्रभू येशूंच्या या संदेशाचे पालन करून हे जग पापमुक्त करू शकता.