पुणे – चौथ्या टप्प्यातील लसीकरण पहिल्या दिवशीपासूनच सुरळीत सुरू झाले आहे. बहुतांश ठिकाणी 45 वर्षे वयापुढील नागरिकांनी लस घेतली.
केंद्र सरकारने एक एप्रिलपासून 45 वर्षे वयापुढील सरसकट सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली. परंतु, बहुतांश नागरिक रजिस्ट्रेशन करूनच लस घेण्यासाठी आल्याचे पहायला मिळाली.
जनता वसाहत, घोरपडे पेठेतील सावित्रीबाई फुले दवाखाना येथील करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रामध्ये दुपारी सव्वा ते दीड वाजेपर्यंत सुमारे दीडशे ते पावणेदोनशे जणांचे लसीकरण झाले; त्यातील सुमारे 100 ते 125 जण 45 वर्षे वयापुढील लाभार्थी होते.
याशिवाय, काही रुणालयांमध्ये साठ वर्षे वयापुढील नागरिकांनी गर्दी केली होती. ज्या केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासूनच गर्दी झाली. अनेक नागरिकांनी कामावर जाताना लस घ्यावी म्हणून सकाळीच केंद्र गाठून लस घेतली. जनता वसाहत, सानेगुरूजी वसाहतमधील केंद्रांमध्येही “वर्किंग’ असलेल्या नागरिकांनी सकाळीच लस घेतली.
दुपारी सव्वा वाजेपर्यंत 170 जणांना लस टोचली. त्यातील सुमारे 100 जण 45 वर्षापुढील आहेत. जनता वसाहतमधील लस टोचक सुनीता रसाळ यांनी सांगितले. कामाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने सकाळी सात वाजल्यापासूनच अनेकजण येथे रांग लावून बसतात. तसेच सहकारनगर, लोकमान्यनगर, कोथरूड या भागातून लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही जास्त असल्याचे रसाळ म्हणाल्या.
दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे 128 जणांना लस टोचण्यात आली. त्यातील 40 जण 45 वर्षे वयापुढील आणि सव्याधीग्रस्त नसलेले होते, असे घोरपडी पेठेतील कै. मालती काची रुग्णालयातील लसीकरण केंद्र प्रमुख डॉ. अक्षय मोराळे यांनी सांगितले. आजपर्यंत एकाही व्यक्तीला गंभीर त्रास झाला नसल्याचे डॉ. मोराळे म्हणाले.
]
झोपडपट्टी भागात जनजागृतीची गरज
झोपडपट्टी भागातील तसेच कनिष्ठ वर्गातील नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे. उच्चवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांचीच संख्या लसीकरणात सहभागी होत आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागात याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. याविषयी विचारले असता माता रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह आणि रुग्णालयाच्या डॉ. मेघा रॉय म्हणाल्या की, वस्ती भागात राहणाऱ्या जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेणे अत्यंत आवश्यक आहे.