पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 3 हजार जणांना मिळणार स्वस्त जेवण
पुणे – शिवभोजन योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या राज्यात 122 शिवभोजन केंद्रांमधून दररोज 14 हजार 180 नागरिकांना जेवण देण्यात येते. आता राज्य शासनाने थाळींची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात दररोज 36 हजार नागरिकांना जेवण मिळणार आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दररोज 3 हजार नागरिकांना जेवण मिळणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत 26 जानेवारीपासून 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू आहे. यामध्ये पुणे शहरातील सात केंद्रांमधून 1 हजार, तर पिंपरी-चिंचवडमधील चार केंद्रांमधून 500 व्यक्तींना जेवण दिले जात आहे. आता नवीन निर्णयानुसार पुण्यात 2 हजार, तर पिंपरीतील हजार नागरिकांना शिवभोजन केंद्रामधून जेवण मिळणार आहे.
शिवभोजन केंद्रांवर नागरिकांना अवघ्या 10 रुपयांत जेवण मिळत आहे. शिवभोजन केंद्रांमध्ये दुपारी 12 ते 2 या वेळेत जेवण मिळत असून 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅम एक वाटी भाजी, 100 ग्रॅम 1 वाटी वरण व 150 ग्रॅम भात या थाळीत समाविष्ट आहे.
राज्य शासनाने स्थानिक स्तरावरून हा योजनेचा विस्तार करण्यासाठी अभिप्राय मागवला होता. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांची गरज पाहून थाळींची संख्या दुप्पट केली आहे. तसेच नवीन केंद्रांची निवड करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे.