सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांची माहिती
– सागर येवले
पुणे – करोनाबाधित सापडताच त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेऊन त्यांना तत्काळ क्वारंटाईन केले जाते. मात्र, वाढत्या बाधितांमुळे क्वारंटाइन व्यक्तींचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, वाढती संख्या लक्षात घेता आणि भविष्यात क्वांरनटाईनची समस्या उद्भवू नये. करोनाचा प्रसार रोखावा, यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी पाहणी करून क्वारंटाईनची क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
महानगरापालिका उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये 2,200, तर बाणेर परिसरातील निकमार येथे 1,300 असे एकूण 3 हजार 500 नवीन क्वारंटाइनची क्षमता वाढवण्यात आली आहे. या आधी सणस मैदान, डॉक्टर लायगुडे दवाखाना, रक्षकनगर, बोपोडीसह अन्य ठिकाणी क्वारंटाईनची सुविधा सुरू आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील अनेकांना सोडण्यात आले असून, सद्यस्थितीत 585 जण क्वारंनटाईन आहेत.’
क्वारंटाईन म्हणजे काय?
एखाद्या भागात करोनाबाधित रुग्ण आढळल्यास, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना संशयित म्हणून क्वारंटाईन म्हणजेच वेगळे ठेवले जाते. या क्वारंटाईन व्यक्तीच्या घशातील स्रावाचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. ज्याचे अहवाल पॉझिटिव्ह येतात, त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. तर ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येतात, त्यांना क्वारंटाइन (विलागीकरण कक्ष) केले जाते. त्यातही दाट वस्ती किंवा झोपडपट्टीचा भागातील क्वारंटाईन व्यक्ती असेल, तर त्याला सक्तीने इन्स्टिट्यूटमध्येच क्वारंटाईन केले जाते. ज्यांच्याकडे स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाते.
भविष्यात क्वारंटाईनची आवश्यकता भासल्यास पूर्वतयारी करण्यात आली आहे. साधारण 20 हजार क्षमतेची व्यवस्था असून, त्यामध्ये 70 वसतिगृहांची यादी तयार आहे. आवश्यकता भासल्यास काही वसतिगृह ताब्यात घेतले जातील. पण तशी वेळ येऊ नये, प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी आपण सहकार्य करून घराबाहेर न पडणे आवश्यक आहे.
– राजेंद्र मुठे, उपायुक्त पुणे महानगरपालिका