नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक संकटाच्या दरम्यान पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक सभेत भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत कार्यकारिणी अध्यक्षपदाचा मान भारताला मिळणार आहे. त्यामुळे २२ मे रोजी होणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत भारत नेतृत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
जपानचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची जागा भारताला मिळणार आहे. दिल्ली आणि जिनेव्हाच्या राजदूतांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भारताची नियुक्ती करण्याचा निर्णय मागील वर्षीच्या दक्षिण पूर्व आशिया समुहाच्या परिषदेमध्ये घेण्यात आला होता. यावेळी पुढील तीन वर्षांसाठी भारताला कार्यकारणी बोर्डात कायम ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. याशिवाय एका वर्षाने आलटून पालटून देण्यात येणाऱ्या अध्यक्षपदामध्ये भारताचे नाव सामील करण्यात आले होते.
चीनच्या वुहानमधून जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अनेक राष्ट्रांवर लॉकडाउनचा कठोर निर्णय घेण्याची नामुष्की ओढावली आहे. कोरोनाच्या लढ्यात विकसनशील देश हतबल झाले असताना भारताने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या कौतुकामुळे भारत या लढ्यात सकारात्मक दृष्ट्या लढत असल्याची पुष्टी झाली होती. एवढेच नाही तर माणूसकीच्या नात्याने कोरोनावरील उपचासाठी उपयुक्त ठरत असलेले हायड्रोक्लोरोक्विन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णयही भारताने घेतला होता.