नवी दिल्ली – देशातील पाच निमलष्करी दलांमधील करोनाबाधित जवानांची संख्या 530 वर पोहचली आहे. त्यातील 5 जवानांचे आतापर्यंत निधन झाले आहे.
देशात केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) अशी पाच निमलष्करी दले आहेत. त्यातील बीएसएफमध्ये सर्वांधिक 221 करोनाबाधित आढळले आहेत. त्याखालोखाल सीआरपीएफच्या 161 जवानांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
आयटीबीपीमधील 94 जवानांना त्या विषाणूची लागण झाली आहे. सीआयएसएफमधील करोनाबाधितांची संख्या 35 तर एसएसबीमधील संख्या 17 इतकी आहे. बीएसएफचे 2 जवान आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. करोना संसर्गामुळे आतापर्यंत बीएसएफ आणि सीआयएसएफचे प्रत्येकी 2 जवान दगावले आहेत. तर सीआरपीएफमध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे.
सर्व निमलष्करी दलांमध्ये मिळून सुमारे 10 लाख जवान आणि अधिकारी कार्यरत आहेत. त्या दलांवर देशाच्या सीमांच्या रक्षणाबरोबरच अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलांमधील करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली.