मुंबई – मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशी एक अफवा पसरविली जात आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका. मुंबईत लष्कर हवेच कशाला. तुम्हाला विश्वासात घेऊनच आतापर्यंत काही पावले उचलली आहेत. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने वाढवला. त्यामुळे मुंबईत लष्कराची गरज नाही. लष्कराचे जवान सीमेवर देशाचे रक्षण करतील. राज्यातील प्रत्येक नागरिक जवान आहे. हे युद्ध आपल्याला लढायचं आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच पोलिसांना विश्रांती देण्यासाठी काही काळ द्यावा लागेल. त्यासाठी केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळ मागावे लागेल. याचा अर्थ लष्कराला पाचारण केले असा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, काल एक चांगली गोष्ट झाली, महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठक झाली. सगळ्यांना काय करतो आहोत त्याची कल्पना दिली गेली. त्यांच्याकडून सूचना घेण्यात आल्या. मला एका गोष्टीबद्दल समाधान आहे की सगळ्यांनी खूप चांगल्या सूचना दिल्या. काल जी बैठक झाली ते एकजुटीचं वेगळं दर्शन होते. रात्यातील सर्व नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी दुणावला, असेही त्यांनी म्हटले आहे.
औरंगाबादमध्ये झालेल्या मजुरांच्या मृत्युविषयी मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी मनातून दुःखी झालो आहे. जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघाले आहेत आपण त्यांना आजही सांगतो आहे की राज्य सरकार तुमच्यासोबत आहे. इतर राज्यातल्या सुमारे सहा लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत. इतर राज्यातही ट्रेन सुरु करुन केंद्र सरकार, आपलं राज्य आणि ज्या राज्यात त्या मजुरांना जायचं तिथल्या सरकारसोबत बोलणी करुन मजुरांना पाठवण्यात येत आहे. या सगळ्यांना माझे सांगणे आहे की तुम्हाला त्रस्त होण्याचे कारण नाही. तुम्ही थोडासा संयम बाळगा आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.