जिल्हा परिषदचे चार गट, पंचायत समितीचे आठ गण ः निवडणूक आयोगाकडून प्रस्तावास मान्यता
हिंजवडी – राज्य शासनाने निवडणूक आयोगाला पाठविलेल्या प्रस्तावास आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. पर्यायाने शहरालगत असलेल्या मुळशी तालुक्यात तीनऐवजी जिल्हा परिषदेचे चार गट तयार होणार असून, पंचायत समितीचे दोन गण वाढविण्यात येणार असल्याने मुळशीला आता एकूण आठ पंचायत समिती गण होणार असल्याची माहिती मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली.
सदस्य संख्या वाढल्याने तालुक्यात इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता वॉर्डरचनेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
परिणामी या निर्णयामुळे पुणे जिल्हा परिषदेत 75 ऐवजी 85 सदस्य निवडून येणार असून मुळशीत 1 जिल्हा परिषदेचा गट वाढणार आहे. गट व गणांची संख्या वाढणार की, आहे तीच कायम राहणार याबाबत मुळशीकरांना उत्सुकता होती. निवडणूक आयोगाने त्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
मुळशीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यास उत्सुक असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता या निर्णयाकडे अनेक मातब्बरांचे लक्ष लागून राहिले होते. परिणामी आपल्या संभाव्य मतदार संघाची रचना कशी असेल, कोणता गण कुठल्या गटाला जोडला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चुरस वाढली
मुळशीतील जिल्हा परिषद सदस्यांची एक जागा वाढून आता चार जागा होणार असल्याने या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. नव्या नियमानुसार आता मुळशीत चार जिल्हा परिषद सदस्य आणि आठ पंचायत समितीचे सदस्य होणार असल्याने इच्छुकांमध्ये अधिक चुरस वाढली आहे.
एक लाख 45 हजार मतदार
मुळशीत जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी 1 लाख 45 हजार मतदान करणारे मतदार आहेत. त्यामुळे ही एक जागा कशा पद्धतीने आणि कुठे वाढणार याचे तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. लोकसंख्येची घनता व नवमतदार तसेच मतदान नोंदणी पूर्व पट्टयातील हिंजवडी, माण, मारुंजी, भुगाव, भुकुम, पिरंगुट या शहरालगतच्या गावात वाढली आहे. या गावाच्या रचनेमध्ये फेरबदल होऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.