नारायण सातपुते
अवजड वाहनांची वाहतूक ठप्प; राजकीय उदासीनतेचा फटका
रेठरे बुद्रुक – रेठरे बुद्रुक आणि पंचक्रोशीला जोडणारा प्रमुख दुवा म्हणून ज्या पुलाची ओळख आहे, तो कृष्णा नदीवरील पूल गत काही महिन्यांपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे विभागातील दळवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. हा पूूल तातडीने दुरूस्त करावा. शिवाय या पुलाला समांतर असा नवीन पूल उभारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
नावचं रेठरे, चैनीचे रेठरे आणि आता महापूर बाधित रेठरे अशी नवीन ओळख तयार झालेले गाव म्हणून रेठरे बुद्रुक गावाची नवीन ओळख तयार झाली आहे. 2006 आणि 2019 ला आलेला महापूर वगळता रेठरे बुद्रुक विभागातील गावांना जोडणारा पूल कधीही पाण्याखाली गेल्याचे ऐकिवात नाही. मात्र, कृष्णा नदीला आलेल्या महापूरात ज्या-ज्या वेळी हा पूल पाण्याखाली गेला त्या-त्या वेळी तो खचला आहे. याचा मोठा फटका रेठरे बुद्रुक आणि पंचक्रोशीतील लोकांना बसला आहे.
या महापुरात पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुलावरील लोखंडी संरक्षक अँगल तुटले तर काही ठिकाणाचा भाग पाण्याबरोबर वाहून गेला. 2006 च्या महापुरात पाण्याच्या दाबाने पुलाचा एक पिलर खचल्याचे समोर आले. तर 2019 ला पुन्हा आलेल्या महापुरात पूल दुसऱ्यांदा खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी बॅरीगेटस् लावण्यात आले आहेत. याचा मोठा फटका येथील वाहतुकीला बसला आहे.
सुमारे वीस हजार लोकसंख्या असणाऱ्या रेठरे बुद्रुक गाव व पंचक्रोशीतील वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील वाड्या वस्त्यावरील लोकांचा या ना त्या कारणाने पुलाशी सातत्याने संबंध आहे. येथील कृष्णा साखर कारखान्याची ऊस तसेच इतर प्रकारची अवजड वाहनांची वाहतूक याच पुलावरून होते. शिवाय राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा एकमेव पूल आहे. कराड, सातारा, इस्लामपूर, सांगलीला ये-जा कण्यासाठी येथील नागरिक प्राधान्याने रेठरे बुद्रुकच्या पुलाचा वापर करतात.
स्व. यशवंतराव मोहिते यांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रुकच्या पुलाची निर्मिती झाली आहे. 1983 च्या सुमारास पुलावरून वाहतूक सुरू झाली. त्या काळी पुलासाठी सर्वसाधारण 83 लाख रूपये खर्च आला होता. या पुलाची लांबी चारशे मीटर असून पूल दहा गाळ्यांचा बनला आहे. मात्र कृष्णा नदीतील बेसुमार वाळू उपशाचा फटका या पुलाला बसल्याचे समोर आले आहे.
2006-07 साली कृष्णेला आलेल्या महापुरात पुलाचा एक खांब खचला. यावेळी पहिल्यांदा पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. या पुलाच्या मजबुतीकरणासाठी सुमारे 1 कोटी 23 लाख रूपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र 2019 ला आलेल्या महापुराचा दणका हा पूल पेलू शकला नाही. पूल वाहतुकीसाठी सुरक्षित बनल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा तो अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कराड तालुक्यात रेठरे बुद्रुक हे गाव राजकीय पटलावरती अतिशय संवेदनशील गावं. गल्ली ते दिल्लीपर्यंत दबदबा ठेवणारे नेतेमंडळी गावात आहेत. येथील जनतेचा अतिशय जिव्हाळ्याचा व संवेदशील असणारा पुलाचा प्रश्न चुटकीसरशी सोडविण्याची ताकद या नेते मंडळींकडे आहे. परंतु राजकीय उदासीनतेचा फटका मात्र येथील जनतेला सोसावा लागत आहे. रेठरे बुद्रुकला जोडणारा नादुरूस्त पूल दुरूस्त तर कराचं त्याबरोबर अवजड वाहतुकीसाठी या पुलाच्या समांतर नवीन पूल उभारण्यात यावा, अशी मागणी रेठरे विभागातून होत आहे.
रेठरे बुद्रुक येथील पुलाचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. पूल दुरुस्तीबाबत बांधकाम विभागामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून पुलाचे उत्तरेकडील बाजूने जवळपास पाच पिलर खचल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूल दुरुस्तीबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत 42 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
दिग्विजय सूर्यवंशी, रेठरे बुद्रुक