डोर्लेवाडी, (प्रतिनिधी)- बारामती तालुक्यातील मोढवे गावात देशी वळूच्या कळपाला त्रासलेल्या नागरिकांनी आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. आतापर्यंत भौतिक गरजासाठी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातलेले ऐकलं असेल. परंतू बारामती तालुक्यातील मोढवे गावातील लोकांनी वळुंच्या कळपाला त्रासून थेट लोकसभेच्या व विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घातल्याचे प्रकरण समोर आले आहे.
बारामती तालुक्यातील मोढवे हे 3745 लोकसंख्येचे गाव प्रामुख्यानी इथल्या लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय परंतु इथल्या नागरिकांना वळुंच्या कळपाने होत असलेल्या त्रासाने शेती करावी का नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोढवे गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णयाचा ठराव एकमताने पास केला आहे.
यावेळी प्रत्यक्ष जंगलात जाऊन या प्रकरणाची पाहणी केली असता तिथं शेकडो देशी गायीचा कळप दिसून आला. विशेष म्हणजे या गायी आता जंगलातल्या प्राण्यासारखं वागतात. नागरिकांवर हल्ला करून पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे मोडवे गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी आपली शेती करायची सोडून दिली आहे. यामुळे बारामती तालुक्यातील मोडवे या गावातील शेतकऱ्यांना आता या खिलार गाईं आणि वळूला त्रासलेल्या नागीरकांना न्याय मिळणार का? लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे त्यांच्या गंभीर समस्या कडे पाहणार का आणि गावातील ग्रामस्थांना न्याय मिळणार का हेच बघावे लागेल..
बारामती तालुक्यातील मोडवे गावातील सहाशे एकर असलेल्या वन क्षेत्रामध्ये शेकडो देशी गाई आणि वळू आहेत.. त्यांचे चार वर्षापासून वास्तव्य आहे दिवसभर ते याच वन क्षेत्रामध्ये राहतात आणि सायंकाळच्या वेळेस शेतकऱ्यांची चारा पिके नष्ट करीत आहेत. ज्यामुळे गेली चार वर्षापासून या गावातील शेतकरी या गाईंच्या त्रासाला कंटाळून गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर शेती करायची सोडून दिली आहे. तसेच या गावांमध्ये शेतीसाठी आणि पिण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे.
शेजारी असलेल्या क्रशरचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात गावातील ग्रामस्थांना होत आहे. याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना या गंभीर समस्याबाबत सूचना केले आहेत. लेखी तक्रारी केले आहेत. मात्र, आमच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने आम्ही आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा ग्रामसभेत ठराव एकमताने मंजूर केला असल्याचे मोढवे गावचे सरपंच वैभव मोरे यांनी सांगितले आहे.