राजगुरूनगर, (प्रतिनिधी): “शिरूरचा खासदार राउंडवर येणारा नको तर ग्राउंडवर येणारा पाहिजे”. असे आवाहन माजी खासदार व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राजगुरुनगर येथे केले.
राजगुरूनगर येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज रविवारी (दि.७) रोजी घेण्यात आला. या वेळी शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते. या मेळाव्याला आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान पोखरकर,
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, अरुण गिरे, अरुण चांभारे, इरफान सय्यद, अशोक भुजबळ, बाबा राक्षे, कैलास सांडभोर, राजू जवळेकर, शांताराम भोसले, दिलीप नाईकनवरे, सुरेखा मोहिते पाटील, नितीन गोरे यांच्यासह शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससह सहयोगी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, चाकण वाहतूक कोंडीवर डॉ. कोल्हे यांनी निवडणूक जिंकली. मात्र, पाच वर्षांत काहीच केले नाही. उलट ८० टक्के निधी त्यांचा परत गेला, असा हा महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहे. त्यामुळे मतदार संघातील प्रश्न सुटले नाहीत. सगळ्याचे कर्तव्य आहे की, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे तर आहेच परंतु आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व अजित पवार यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, त्यांनी जो शब्द दिला आहे, तो साकार करायचा आहे. जनतेत राहणाऱ्या माणसाला निवडून द्या. शिरूरचा खासदार राउंडवर येणारा नको तर ग्राउंडवर येणारा पाहिजे त्यासाठी सर्वानी काम करा, असे आवाहन केले. नाशिक रेल्वे आणि चाकण वाहतूक कोंडी, असे महत्त्वाचे प्रश्न सोडविणारा खासदार करा.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, आपल्याला नियोजन करायचे आहे, दादांना निवडून आणायचे आहे. वेगळ्या विचाराची माणसं आपण एकत्र आलो आहोत. मतातील अंतर कमी करण्यासाठी आपण परत परत भेटलो पाहिजे. ५ वर्षे जीवाचे रान केले. मात्र त्याच नेत्याने त्याची जाणीव ठेवली नाही. कधी ऑफिस घरी बोलावले नाही कधी कोणत्या प्रश्नावर चर्चा केली नाही.
दैनंदिन जीवनात मदत करणारा माणूस आपला.माणूस असतो खासदार करण्यासाठी जीवाचे रान केले मात्र ते साधं दुःखात भेटायला आले नाही. याची मोठी खंत आहे. संसदेत बोलले, विधानसभेत बोलले म्हणजे उपकार केले का? सर्वसामान्य माणसाने निवडून दिले आहे तुमचे ते कर्तव्य होते. कार्यकर्त्यांनी गावात नियोजन करावे. मतदान जास्त कसे होईल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. ही चढाओढ कार्यकर्त्यांमध्ये राहुद्या.
शरद बुट्टे पाटील म्हणाले, राष्ट्रहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे. मतभेद, मनभेद बाजूला ठेवून ही निवडणूक देशाच्या हितासाठी हातात घ्यायची आहे.
निवडून गेलेले खासदार गावात कधी फिरकले नाहीत. पाच वर्ष लोकांची फसवणूक केली. सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हावे. निष्क्रिय खासदार बाबत प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. लोकांमध्ये जाणारा माणूस उत्तम काम करणारा माणूस म्हणजे आढळराव पाटील हे आहेत. ९० टक्के योजना माहिती नसणारा खासदार डॉ. कोल्हे या लोकप्रतिनिधीला निवडून देवून आपण चूक केली, अशी घणाघाती टीका बुट्टे यांनी डॉ कोल्हे यांच्यावर करीत चांगला समाचार घेतला.
कार्यकर्ता मेळाव्याच्या फ्लेक्सवर अनेकदा आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा फोटो लावला नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी निर्मला पानसरे,भगवान पोखरकर, इरफान सय्यद, राजू जवळेकर, शांताराम भोसले, कैलास सांडभोर, दिलीप नाईकनवरे, नितीन गोरे, यांनी मनोगत व्यक्त केले.