पौड, {सचिन केदारी} – पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे आणि अशातच लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झालेली असून यात्रा- जत्रा हंगामावर निवडणुकीचे सावट आले आहे. ग्रामीण भागात यात्रा, जत्राला विशेष महत्व असते. निवडणुकीमुळे मनोरंजन, अन्य कार्यक्रमांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे वर्षभराची रोजीरोटी असलेल्या या तमाशांवर सावट आले असून कलावंतांच्या अर्थकारणावर दूरगामी परिणामाची शक्यता आहे.
गावचे ग्रामदैवताच्या पूजावत विधी पालखीसोबतच करमणुकीसाठी विविध तमाशा, भारुड, ढोल ताशा वादन, मंडळांना देखील मागणी असते. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत रात्रीचा चालू असलेला तमाशा सादरीकरण यावर निर्बंध येऊ शकतात. विशेषतः रात्री चालणारे हे कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार रात्री दहानंतर सुरू राहतील की नाही, याबाबत सांशकता आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान यात्रांना मात्र १० वाजेपर्यंतच कार्यक्रम करण्याची बंधने आली तर स्थनिक ग्रामस्थ व तमाशा कलावंत यांच्यामध्ये वाद विवाद होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या काळात गावचा धार्मिक कार्यक्रमास गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याकरिता ग्रामीण भागातील यात्रावर रात्रीच्या करमणुकीचा कार्यक्रमावर बंधने लावू नये, अशी मागणी होत आहे.
लोकसभा निवडणूक काळ सुरू असला तरी पारंपरिक ग्रामदैवतांच्या यात्रा यामध्ये करमणुकीचे कार्यक्रम गावच्या वतीने तमाशा ठेवण्यात आला आहे. भारुड, संगीत, पारंपरिक ढोल, ताशा वादन, भजन आदी कार्यक्रमावर बंधने लावू नये. ग्रामस्थ व गावकरी हजारो रुपये वर्गणी काढून असे कार्यक्रम आयोजित करतात. यावर बंधने आल्यास ग्रामस्थांचे व तमाशा कलावंतांना सुद्धा याचे आर्थिक नुकसान होऊ शकते. – अनिल केदारी, नागरिक
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावच्या यात्रा मधील पारंपरिक धार्मिक कार्यक्रमास बंधने नाहीत पण आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी .वेळेचे बंधन पाळावे रात्री १०.०० नंतर वाद्ये वाजवता येणार नाहीत राजकीय सन्मान केल्यास राजकीय फलक लावल्यास आचारसंहिता भंग झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. मनोजकुमार यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पौड
ग्रामीण भागात यात्रेतील कार्यक्रम होणार का नाही या चर्चेला उधाण
ग्रामस्थांमध्ये यात्रेचा विधिवत पूजा, मिरवणूक, मनोरंजन कार्यक्रम नियोजनावर कसरत सुरू
आचारसंहिता भंग झाल्यास पोलिसांकडून कारवाईचा इशारा
यात्रेदरम्यान प्रशासन व पोलिसांकडून ग्रामस्थांना सहकार्याची अपेक्षा