पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहराचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने एप्रिल आणि मे महिन्यात तापमान कितीपर्यंत जाऊन पोहोचेल याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. सध्या शहरातील तापमानाने 40 शी पार केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच कंपनीमध्ये कामाला जाणार्या नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडताना पुरेसी काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारी बारा नंतर घराबाहेर पडणे टाळावे. जर पायचेच असेल तर टोपी, गॉगल आणि पूर्ण अंग झाकेल, असे कपडे वापरा, विशेष खबरदारी म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक असलेले अती थंड पेय पिण्याचे टाळावे.
उद्योगनगरीचे मागील दहा दिवसातील तापमान साधारण 37 ते 42 अंशापर्यंत वाढले आहे. हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारी रस्ते रिकामे पडत आहेत. दरम्यान, हा असह्य उन्हाचा चटका घात करू शकतो, त्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करून उष्माघाताचा बळी जाण्याचा धोका आहे.
विशेषत: लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना उन्हामध्ये पाठवू नये, पाणी जास्त प्यायला द्यावे, आहार हलका आणि पौष्टीक असावा. उन्हामुळे शरिरातील पाणी कमी झाल्याने चक्कर येणे, डोके दुखणे, डोळ्यावर भोवळ, छातीत दुखणे अशा घटना घडतात. त्यामुळे शक्यतो अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ सावलीमध्ये शांत बसावे.
अशी घ्या काळजी
दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे
घराबाहेर पडण्याआधी अर्धा तास पुरेसे पाणी प्यावे
हृदयरोग, मधुमेह असलेल्यांनी उन्हामध्ये जावू नये
नाका-तोंडाला रूमाल बांधावा, टोपी, डोळ्याला गॉगल असावा
स्वत:जवळ पाण्याची बाटली, गोड पदार्थ असावा
उन्हातून सावलीत आल्यावर हे करू नये
उन्हातून घरी आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये
पाणी गटागटा आणि उभे राहू पिऊ नये
तेलकट आणि उष्ण पदार्थ खाणे टाळावे
उन्हातून आल्यावर दहा मिनिटे शांत डोळे मिटून बसावे
काहीसे गार असलेल्या पाण्याने डोळे धुवावेत
थंड पेय पिताय सावधान!
उन्हातून प्रवास करून आल्यानंतर अथवा प्रवास करत असताना बहुतांश नागरिक थंड पेयांना पसंती देतात. परंतु आपण पित असलेले थंड पेयय शुद्ध आणि दर्जेदार आहे का, ते पिल्याने आपल्या शरीराला बाधणार तर नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे. थंड पेयामध्ये वापरण्यात येणारा बर्फ शुद्ध आहे का, याचीही खबरदारी घ्यावी. अशुद्ध बर्फ आणि कडक उन्हामध्ये थंड पेय पिल्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास होण्याची भीती आहे.