सातारा -जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. महाविकास आघाडी शासनाच्या काळात खोटी भूमिपूजने आणि आश्वासने देऊन लोकांना भुलविण्यात आले. सातारच्या मेडिकल कॉलेजला एक रुपयासुद्धा मिळालेला नाही, असा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या नेमणूक प्रमाणपत्र समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमातनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, एकनाथ ओंबळे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, शहर प्रमुख नीलेश मोरे, जिल्हा संघटक चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. महेश शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये सातारा जिल्ह्याला भरघोस निधी दिला आहे एकट्या कोरेगाव तालुक्यात रस्ते कामांसाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला आहे.
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी शासनाने सातारा जिल्ह्यासाठी काही केले नाही. त्यांचा खोटा कळवळा आणि त्यांची खोटी भूमिपूजने यातच बराचसा वेळ गेला. सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी एकही रुपया दिलेला नाही.’ यापुढे पायाभूत सुविधांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी “50 खोके, एकदम ओके’ या वादग्रस्त घोषणा दिल्या. याविषयी शिंदे म्हणाले, “”गेल्या अडीच वर्षात या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारला फक्त खोक्याची भाषा कळत होती.
त्यांचे कॉन्ट्रॅक्टर, बडे भांडवलदार यांच्याशी संबंध होते. त्यामुळे ज्याला जसं दिसतं सुचतं, तशा घोषणा दिल्या जातात. मी विधानसभेच्या बाहेर पडताना मला बघूनच या घोषणा दिल्या गेल्या. पण मला 50 कोटी रुपये विकास कामांसाठी मिळाले यातच मी समाधान मानतो.’ रयत शिक्षण संस्थेसंदर्भात महेश शिंदे म्हणाले, “ही संस्था पवार लिमिटेड कंपनी झाली आहे. संस्थेच्या घटनेप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री हवे आहेत.
शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे खरे पाईक असून ते आमच्या मागणीचा विचार करून कधी तरी राजीनामा देतील आणि मुख्यमंत्री कधीतरी या संस्थेचे अध्यक्ष होतील. मात्र, तत्पूर्वी या संस्थेमध्ये बरेचसे चालणारे गैरप्रकार आमच्याकडे पुराव्यानिशी आले आहेत.’ जरंडेश्वर कारखाना 100 दिवसांत ताब्यात घेऊ, या घोषणेबद्दल शिंदे यांना छेडले असता ते म्हणाले, “जरंडेश्वर कारखाना प्रकरण ईडीच्या माध्यमातून न्यायप्रविष्ट आहे. मात्र, दरम्यान शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरू व्हावा आणि तो शेतकऱ्यांचा राहावा याकरिता आमचे कायदेशीर दाद मागण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.’ पण शेतकऱ्याच्या हातातून कारखान्यात जाऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.
“शशिकांत शिंदे राष्ट्रीय नेते’
आमदार शशिकांत शिंदे भाजपमध्ये आले तर त्यांचे मनापासून स्वागत आहे. पुढे त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करायचे हे वेळ आल्यानंतर बघू. सध्या तरी ते राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत, त्यांच्याविषयी मी जास्त बोलू नये कारण मी एक सामान्य आमदार आहे, अशी कोपरखळी त्यांनी एका उत्तरात मारली.