14 नागरिकांच्या घरांचे करणार होते संपादन
शासनाच्या उदासीन धोरणांमुळे स्थानिकांची घरे कोसळणार
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारकाच्या कामाला शासनाकडून उशीर होत असल्याने त्या लागत असलेल्या स्थानिकांनी पडायला आलेली घरे पाडून नव्याने बांधण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. ते करण्यातही जवळपासच्या सुमारे 14 नागरिकांच्या घरांचे संपादन करण्यात येणार असून त्याजागेवर देखणे स्मारक बांधण्यात येणार होते; मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे हे काम मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी पक्की घरे बांधण्यात सुरुवात केली आहे.
वर्षामागून वर्षे सरत आहेत. निवडणुकांमागून निवडणुका होत आहेत. निवडणुकीत प्रचारासाठी आलेले मंत्री, निवडून आलेले खासदार, आमदार केवळ आश्वासनांची खैरात करीत गेले. येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ काम मात्र शून्य आहे. गेल्या 10 वर्षांपासून या महान देशभक्तांच्या जन्मस्थळाचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्यासाठी आराखड्या मागून आराखडे झाले; मात्र या थोर क्रांतीकारकांची स्वातंत्र्यानंतर उपेक्षाच झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या आणि राजगुरूप्रेमींच्या भावनांचा जणू खेळ खेळला जात असल्याची प्रचीती राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे येत आहे. या राष्ट्रींय स्मारकाला कधी निधी मिळणार हा मोठा प्रश्न सर्वांना सतावत आहे.
उदासीन शासन, अकार्यक्षम प्रशासन आणि मतांचे राजकारण करणारे तालुक्यातील नेते अभिज्ञ अशी परिस्थिती स्मारकाबाबत बनली आहे. देश स्वातंत्र्यानंतर 76 वर्षे होत आली; मात्र हुतात्मा राजगुरू या थोर क्रांतिकारकाचे राष्ट्रीय स्मारक मात्र बनले नाही. या जन्मस्थळ वाड्यात हुतात्मा राजगुरू यांची जन्मस्थळ खोली, थोरला वाडा आणि त्यातील देवघर, व्यायाम खोली, अभ्यासाच्या खोलीचे काम झाले आहे. शासनाकडून भरीव तरतूद होत नसल्याने देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ स्मारकाचे सुशोभीकरण, अतिक्रमणे हटविणे, परिसराचा विकास आणि अत्याधुनिक सुविधा करता येत नाहीत. राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य आणि केंद्र शासन पातळीवर याचा पाठपुरावा होत नसल्याने या जन्मस्थळास भरीव तरतूद होत नाही.
पुरातत्व विभागाच्या व जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून प्रथम 25 कोटी त्यानंतर 56 कोटीचा आराखडा बनवण्यात आला वर्षानुवर्षे हे आराखडे शासनस्तरावर पडून राहिले त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर 2016 मध्ये 78 कोटीचा प्रस्ताव सामान्य विभागाकडून मंत्रालयातील उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, दोन वर्षे हा प्रस्ताव शासनाच्या लाल फितीत अडकला आहे. त्यावर अद्यापर्यंत कोणताही निर्णय न झाल्याचे समजते. यामुळे सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आला आहे. स्मारकाचा प्रस्ताव 78 कोटीचा असताना केवळ 5 कोटीची तरतूद केली. मात्र, हा निधी आलाच नाही. गेल्या 25 वर्षांपासून या स्मारकाचे केवळ आराखडे आणि पाहणी अहवाल केले. मात्र, प्रत्यक्षात शासन दुर्लक्ष करीत आहेत.
प्रशासन सांगते घर बांधू नका
जन्मस्थळ वाड्याजवळील असलेली घरांचे संपादन करून त्यांना इतर ठिकाणी हलविण्यात येणार होते, त्या बदल्यात त्यांचे पुनर्वसन शासन करणार आहे. त्यामुळे येथे राहणारी 14 ते 20 कुटुंबाने त्यांच्या पडायला आलेल्या घरांची डागडुजी केली नव्हती. वर्षामागून वर्षे उलटत असून जन्मस्थळ वाड्याला भरीव निधी मिळत नसल्याने जवळपासच्या नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. हुतात्मा राजगुरूंच्या वाड्याजवळ कोनालाखी पक्की घरे बांधू देण्यास प्रशासन व पुरातत्व विभाग हरकत घेत आहेत; मात्र या नागरिकांनी पडक्या मोडक्या घरात राहायचे का याचा विचार ते करीत नसल्याने येथील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. शेवटी एका नागरिकांनी त्याच्या मालकीचे चार गुंठ्यांतील घर पडून केवळ 400 चौरस मीटरचे घर बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यावरही आता प्रशासन घर बांधू नका असे सांगत आहेत.