अंब्रेला गार्डनमधील प्रकार; उद्यान विभागाचे दुर्लक्ष
– उमेश अनारसे
पिंपरी – चिंचवड, संभाजीनगर येथे अंब्रेला गार्डन आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने या गार्डनमध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली आहे. उद्यानात विकासकामे मोठ्या जोमाने सुरू आहेत. गार्डनमध्ये फिरण्यासाठी मोठा जॉगिंग ट्रॅक आहे. या ट्रॅकच्या बाजूलाच असणारी आंब्याची झाडे पाण्याअभावी वाळून गेली आहेत. तरीदेखील गार्डनची देखभाल करणारे आणि उद्यान विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही उद्यान विभागाला जाग येत नाही.
फळांचा राजा आंबा आहे. परंतु त्याच राजाला मोहर आणि आंबे येण्यापूर्वीच उद्यानविभागाच्या दुर्लक्षामुळे तीन-चार वर्षांच्या झाडांना पाण्याअभावी आपला जीव सोडावा लागला. “झाडे लावा देश जगवा’ असा संदेश देणारे उद्यान विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांच्या कृती आणि बोलण्यात दुजाभाव असल्याचे दिसत आहे. त्यांची अवस्था म्हणजे “लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ अशीच काहीसी आहे. पाऊस पडला की झाडे लावायची आणि उन्हाळा सुरू झाला की पाण्याअभावी त्याच झाडांचा गळा गोठायचा. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. गार्डनमध्ये लिंब, चाफा, बांबू, निलगेरी, शोभेची झाडे अशा विविध प्रकारचे वृक्ष आहेत. उद्यान विभाग विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु या वृक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यास प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आठ आंब्याची झाडे जिवानिशी गेली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
गार्डनमध्ये अस्वच्छता
संभाजीनगर भागातील अनेक नागरिक सकाळ सकाळी स्वच्छ हवा घेण्यासाठी व पर्यावरणाच्या सानिध्यात जाऊन निरोगी आरोग्य प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गार्डनमध्ये येत असतात. परंतु गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गवत उगवले होते. तेच गवत उन्हाळ्यामुळे वाळून गेले आहे. तसेच प्लॅस्टिकच्या बॉटल ठिकठिकाणी पडल्या आहेत. झाडांचा पालापाचोळा पडल्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. त्याचा उपयोग गांडुळखत निर्मितीसाठी करणे आवश्यक आहे. परंतु याकडे उद्यान विभाग दुर्लक्ष करत आहे.
ओपन जिमच्या साहित्याची दुरवस्था
नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिका प्रशासनाने गार्डनमध्ये ओपन जिम उभारली आहे. परंतु येथील सुरक्षारक्षक लक्ष देत नसल्याने गार्डनची तसेच जिमची दुरवस्था झाली आहे. जिमच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. त्यामुळे गार्डनमध्ये जिम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी महापालिकेच्या उद्यान विभागाने याची दखल घेऊन येथील समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना झाडांना पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. विकासकामे सुरू असल्याने कर्मचारी तिकडे जात नाहीत. त्यामुळे झाडांकडे दुर्लक्ष झाले असावे. कर्मचाऱ्यांना त्वरित पाणी सोडण्याचे आदेश देतो.
– दत्तात्रय एन. गायकवाड, उद्यान अधीक्षक