पुणे(प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत पाचवा लॉकडाऊन घोषित केला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरनाचे (महारेरा) कामकाज तोपर्यंत बंद राहणार आहे. याबाबत महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. दरम्यान अपिलेट ट्रिब्युनल सोमवारपासून (दि.8) सुरू झाले आहे. पुढील आदेश येईपर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी हे सुरू असणार आहे. जे वादी-प्रतिवादी अंशत: सुनावणी अथवा अंतिम सुनावणी घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना अपिलेट ट्रिब्युनला आगाऊ कळवाले लगणार आहे. त्यानंतर त्यावरील सुनावणी घेण्यात येणार असल्याचे रेरा प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. निलेश बोराटे यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यापासून जगभरामध्ये करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. देशातही सुरुवातीला 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला. त्यानंतर 17 मेपर्यंत, त्यानंतर 31 मेपर्यंत वाढविण्यात आला. आता 30 जूनपर्यंत पाचवा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
याच धर्तीवर कार्यालयात होणारी गर्दी टाळून करोनाचा प्रादुर्भाव रोखणयासाठी महारेरा बंद राहणार आहे. मात्र, प्रकल्प नोंदणी, एजंट नोंदणी, विस्तार दुरुस्ती कार्य यासारख्या सेवा ऑनलाईन सुरू राहणार आहेत. दरम्यान पाचवे लॉकडाऊन संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार महारेराच्या कामकाज बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.