पुणे : खून प्रकरणात 7 वर्षांपासून तुरूंगात असलेला आरोपी, करोनाच्या सावटामुळे लांबत असलेली सुनावणी, किती दिवस ही परिस्थिती राहतेय हे सांगता येत नाही, केस संपलेली आहे. असा लेखी युक्तीवाद देत बचाव पक्षाने केलेल्या निकाल देण्याच्या मागणीनुसार सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी सबळ पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे सात वर्षांपासून तुरूंगात असलेल्याला दिलासा मिळाला आहे.
पोलिसांच्या तपासातील त्रुटी दाखवून, तसेच घटना पाहणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने आणि फिर्यादी, इतर साक्षीदार यांच्या साक्षीवरून गुन्हा सिद्ध होत नसल्याने दोघांना सोडून देण्याचा युक्तीवाद ऍड. ईब्राहिम अब्दुल शेख यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला.
विकास रामेश्वर राऊत (वय – 31), अक्षय उमाकांत वाटकर (वय- 21, दोघेही रा. कासारवाडी) अशी त्या दोघांची नावे आहेत. बचाव पक्षातर्फे ईब्राहीम अब्दुल शेख यांनी कामकाज पाहिले. त्यांना ऍड्. नौशाद जमादार यांनी सहकार्य केले. एका महिलेचा खून केल्याच्या आरोपावरून दोघांना अटक झाली होती. मृत महिलेच्या बहिणीने भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे. अक्षय जामिनावर होता तर, विकास सात वर्षांपासून तुरूंगात आहे. त्याचा केटरिंगचा व्यवसाय होता तर मयत त्याच्याकडे कामास होती. प्रेम झाल्याने दोघे एकत्र राहत होते. तो लग्न करण्यास तयार नव्हता यातूनच गळा दाबून तिचा खून केल्याचा आरोप होता.