पुणे : लॉकडाऊनमध्ये अवघ्या 3 दिवसांत 4 अल्पवयीन मुलांचे अपहरण करण्यात आले आहे. यामध्ये तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे. त्यांना लग्नाच्या व इतर आमिषाने फूस लावून पळविले गेले आहे. याप्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. संबंधीत मुलींचे वय 14 ते 16 दरम्यान आहे. तसेच या घटना 21 ते 23 जूलै दरम्यान घडल्या आहेत. यातील तीन गुन्हयातील आरोपी अज्ञात आहेत.
पुणे शहरात अल्पवयीन मुलींच्या अपहरण किंवा बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे आहे. मध्यंतरी यासाठी एक वेगळा सेल तयार करुन मुलींचा शोध घेतला जात होता. अपहरण करणारे एकतर परिचयाचे किंवा शेजारील व्यक्ती असल्याचे अनेक घटनांमध्ये आजवर निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेले जाते. तर काही घटनांमध्ये नोकरी किंवा इतर काही आमिषाने पळवले जाते.
कोंढवा पोलिस ठाण्यात कोंढवा खुर्द येथे रहाणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार, तीच्या 16 वर्षाच्या मुलीचे रहात्या घरातून अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक गपाट करत आहेत. तर मुंढवा पोलिस ठाण्यात 39 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मुलीस कशाचीतरी फुस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक घाटगे करत आहेत.
मुंढवा पोलिस ठाण्यात आणखी एका 40 वर्षाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनूसार, त्यांच्या 16 वर्षाच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत. तर विमानतळ पोलिस ठाण्यात एका 31 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनूसार तीच्या 15 वर्षाच्या मुलीस वस्तीमध्ये रहाणाऱ्या विकास संजय कदम (रा.लोहगाव) याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक काळे करत आहेत.