मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखतीद्वारे राज्यात मागील महिनाभरापासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले आहे. या मुलाखतीतून त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांपासून ते राजकीय भवितव्यापर्यंतच्या सर्व मुद्यांवर म्हणणे स्पष्ट केले आहे. या मुलाखतीचा पहिला भाग २६ जुलै रोजी तर दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर मनसेकडून खोचक टीका करण्यात आली आहे. ही मुलाखत म्हणजे माझाच बॉल माझीच बॅट, मीच अपंयार आणि मीच बॉलर अशी आहे असे मनसेकडून म्हटले गेले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरे यांचा मुलाखतीवरून टीका केली आहे. याविषयी बोलताना देशपांडे यांनी, “माझीच बॅट माझाच बॉल, मीच फिल्डर मीच अंपायर अशी ती मुलाखत आहे. आम्ही मराठी माणूस आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. जेव्हा मनसेचे सहा नगरसेवक तुम्ही फोडले किंवा चोरले तेव्हाच मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेनेने केले. त्यामुळे मराठी माणसाबद्दल बोलायचा हक्क शिवसेनेला नाही. प्रत्येक वेळी मुंबई धोक्यात आहे, महाराष्ट्राचे तुकडे होणार आहेत या भावनिक राजकारणाचा आता फायदा होणार नाही,” अशी टीका देशपांडे यांनी केली.
“तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारले असते, तर राज ठाकरेंनी तुम्हाला पाठिंबा दिला असता. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला, तेव्हा तो मराठी माणसाच्या छातीत खंजीर खुपसलेला नव्हता का? शिवसेनेने भाजपाशी युती का तोडली, का ठेवली हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. शिवसेनेने जे कटकारस्थान केले त्याचे फळ शिवसेना आज भोगतेय,” असा सणसणीत टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.
दरम्यान, संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग २६ जुलै तर दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला. या दीर्घ मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. बंडखोरांनी मी रुग्णालयात बेशुद्ध असतानाही सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. तसेच बंडखोरी करणारे केवळ पालापाचोळा आहेत. त्यांची पानगळ होऊन पक्षाला नवीन पालवी फुटेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केला.