रस्ताच गायब; गणेश विसर्जनात व्यत्यय; भाविकांना त्रास
पिंपळे गुरव – सर्वत्र गणेशोत्सव आनंदात साजरा होत आहे. कोणी दीड दिवस तर कोणी पाच दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. पिंपळे गुरव परिसरातील विसर्जन घाटाच्या भाविकांना येण्या जाण्यासाठीचा जो मार्ग आहे. तो मार्ग सध्या चिखलमय झाला आहे. त्यामुळे भाविकांना याचा त्रास होत आहे.
गेल्या कित्येक महिन्यापासून या परिसरात खोदाई व ड्रेनेज लाईनचे काम सुरु आहे. त्यासाठी मोठ-मोठे खड्डे खणण्यात आले आहेत. सध्या पाऊस सुरु असल्यामुळे येथील रस्ता संपूर्णपणे चिखलमय झाला आहे. रस्त्यावर ड्रेनजचे पाईप तर कुठे चेंबर तुटलेले किंवा पिंपळे गुरवमधील तुळजाभवानी मंदिर परिसरापासून ते पूर्ण साठ फुटी रोड लक्ष्मी नगर या सर्व रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून येथील रस्ताच गायब झाला आहे. नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत आहे. तसेच विसर्जन घाटाच्या पायरीवर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे हिरवे शेवाळ जमले असून त्याच्यावरून पाय घसरत असल्याची तक्रार नागरिकांतून सुरु आहे.
सध्या गणेश उत्सवासाठी सर्व ठिकाणी परिसरातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ या मार्गावरुन होत असते. रस्त्यावर चिखल पसरल्याने तसेच पाऊस पडत असल्यामुळे वाहने घसरत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवविण्यात येत आहे. पावसाळ्यात ही कामे का काढली जातात? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी ही कामे करावीत, अशी मागणी देखील नागरिक करत आहे. दीड दिवसाचे गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांना चिखलातून वाट काढून गणेशाचे विसर्जन करावे लागले. विजसर्जनाच्या वेळी वयोवृद्ध व्यक्ती किंवा कुणाचे तरी पाय घसरुन पडल्यास त्यांना इजा पोहचण्याची शक्यता आहे.
सध्या विसर्जन घाटावर स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम सुरु आहे. उद्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. आपल्याकडे दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन जास्त नसतात. पाच दिवसाचेच जास्त असतात. तसेच याठिकाणी सुरक्षा रक्षक व्यवस्थाही नेमण्यात आली आहे. घाट स्वच्छता व हौद बांधण्यात आले आहे.
शशिकांत कदम, नगरसेवक