पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वाटाड्यापासून आता सोशल मीडिया आणि ई-मेलवर निरोप पाठविण्याच्या युगापर्यंतचा दीडशे वर्षांच्या बदललेल्या जगाचा प्रवास पत्ररूपातून उलगडणार आहे. भविष्यातील पिढ्यांना हा प्रवास माहिती व्हावा, या उद्देशाने पुणे ग्रामीण टपाल विभागाच्या वतीने आंतराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. दि. २ मार्च रोजी शहरातील शाळांंमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
यामध्ये ९ ते १५ वर्षे वयोगटासाठी ही स्पर्धा असेल. १५० वर्षांच्या कार्यकाळात आंतराष्ट्रीय टपाल संघटनेने जगभरातील लोकांची सेवा केली आहे. तेव्हापासून जग बदलले आहे. भविष्यातील पिढ्यांना या जगाबद्दल एक पत्र लिहा असा या स्पर्धेचा विषय आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीनही माध्यमांसाठी ही स्पर्धा असून राज्य पातळीवर अनुक्रमे २५ हजार, दहा हजार आणि पाच हजार रूपयांचे बक्षीस असून केंद्रीय पातळीवर ५० हजार २५ हजार आणि दहा हजारांचे बक्षीस असणार आहे. या स्पर्धेत शहर तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा असे आवहन पुणे डाकघर ग्रामिण विभागाचे अधिक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी केले आहे.