नागपूर : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरविषयी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. त्यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील सरकारच्या कामाला पाठिंबा देत देशात आता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे असे वाटत आहे असे म्हटले आहे. नागपूरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात भागवत यांनी सरकारवर स्तुतिसूमने उधळली.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याची मागणी ही देशातील नागरिकांचीच होती त्यामुळे केंद्रातील सरकारने एवढे मोठे धाडस केले आहे. त्यामुळेच देशातील नागरिक आता देशातील लोक म्हणतात मोदी है तो मुमकिन है, असे म्हणत आहेत आणि हेच सत्य असल्याचे मतही भागवत यांनी यावेळी मांडले. तसेच सद्य:स्थितीत देशाच्या नेतृत्वात जी संकल्पशक्ती आहे तिला समाजाच्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. यातूनच जनतेमध्ये विश्वास निर्माण होतो आणि जम्मू काश्मीरसाखा कौतूकास्पद निर्णय सरकार घेते असेही भागवत यांनी यावेळी म्हटले. भागवत यांनी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात तिरंगा फडकविला. या वेळी संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.